सातारा : जिल्ह्यात तुरळक सरी; बळीराजा चिंतेत | पुढारी

0
15









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले असले तरी मान्सूनचा पाऊस काही जोर पकडेनासा झाला आहे. यामुळे बळीराजाची चिंता मिटेनाशी झाली आहे. सोमवारी सातार्‍यात दिवसभर ऊन- पावसाचा खेळ सुरू होता. मात्र, मुसळधार पावसासाठी बळीराजाचे चातकासारखे वाट पहात आहेत.

शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारीही जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सोमवारी मात्र पावसाने पूर्णत: उघडीप दिली असल्याचे चित्र पहावयास मिळाले. सर्वत्रच अधूनमधून ऊन व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. दिवसभर सातारा शहर व परिसरात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मान्सून पाऊस लागून राहील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, सोमवारी ऊन व निरभ्र आकाशामुळे मान्सून पावसाची आशा मावळली. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे पुन्हा आभाळाकडे डोळे लागून राहिले आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात सातारा 10.9 मि.मी., जावली 15.5 मि.मी., पाटण 16.3 मि.मी., कराड 3.9 मि.मी., कोरेगाव 3.6 मि.मी.,खटाव 1.1 मि.मी., माण 1.1 मि.मी., फलटण 2.2 मि.मी., खंडाळा 8.0 मि.मी., वाई 5.9 मि.मी. आणि महाबळेश्वरमध्ये 63.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.











Source link