खटाव; पुढारी वृत्तसेवा : तुमच्या पाल्याचा आमच्या महाविद्यालयात घ्या. त्याच्या हजेरी पटाचे आम्ही पहातो. बारावी बोर्ड परीक्षेला लागेल ती मदत करतो, अशी खुल्लम खुल्ला ऑफर काही महाविद्यालये विद्यार्थी आणि पालकांना देत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे कॉपीमुक्त परीक्षा अभियानाला यामुळे हरताळ फासला जात आहे. अशा घटना घडत असताना शिक्षण विभाग मात्र अनभिज्ञ आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने शिक्षक भरती केली नसल्याने बहुतांश महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ शिक्षकांची संख्या कमालीची रोडावली आहे. हाता-पाया पडून तासिका तत्त्वावर घेतलेले शिक्षक शिकवताना फक्त पाट्या टाकण्याचे काम करत आहे. त्यामुळे अध्यापनाचा फज्जा उडाला आहे. याचाच परिणाम म्हणून पालक आणि शिक्षक 11 वी शास्त्र शाखेत प्रवेश घेताना मोठ्या शहरांमधील मोठ्या क्लासेस आणि अॅकॅडमींची निवड करत आहेत. अनेक अॅकॅडमींमध्ये बोर्ड परीक्षा देण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागतो. नेमकी हीच संधी साधून काही महाविद्यालये विद्यार्थी आणि पालकांना ऑफर देत आहेत.
तुम्ही पाल्याचा प्रवेश शहरांमधील क्लासेस किंवा अॅकॅडमीमध्ये घ्या. मात्र, आमच्याकडे 11 वी शास्त्र शाखेत प्रवेश घ्या. आम्ही तुमच्या पाल्याच्या हजेरी पटाचे, बोर्ड प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेला लागेल ती मदत करतो अशी खुल्लम खुल्ला ऑफर दिली जात आहे. अशा प्रकारे प्रवेश घेण्याच्या बदल्यात देणगीचे गोंडस नाव देऊन हजारो रुपये उकळले जात आहेत. पालकही बोर्ड परीक्षेला मदत करणार आहेत म्हणून पैशांकडे न पाहता अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत.
फेब्रुवारी – मार्चमध्ये झालेल्या 12 वी बोर्ड परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांचे ग्रुपचे गुण क्वालिफाय न झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सीईटी, जेईई सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळूनही बोर्ड परीक्षेला कमी गुण मिळाल्याने अनेकांचे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले आहे. नेमकी हीच भीती असल्याने आणि शहरांमधील क्लासेस, अॅकॅडमी बोर्ड परीक्षेच्या अभ्यासक्रमावर हवे तितके लक्ष देत नसल्याने विद्यार्थी ऑफर देणार्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. जी महाविद्यालये असे प्रवेश देत आहेत त्या महाविद्यालयांमध्ये बोर्ड परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार घडत असल्याचे समजत आहे. राज्यात कॉपीमुक्त अभियान मोठा गाजावाजा करुन राबवले जात असताना काही महाविद्यालयेच सामूहिक कॉपीसारख्या गैरप्रकारांना खतपाणी घालत असतील तर ही बाब धक्कादायक आहे. शिक्षण विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याहूनही धक्कादायक आहे.
तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे खासगी क्लासेस
अनेक महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणारे शिक्षक स्वतःचे खासगी क्लास चालवत आहेत. शासनाच्या उदासीनतेमुळे केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांना खासगी क्लासेस चालवावे लागत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून, भीती दाखवून बोर्ड परीक्षेतील गैरप्रकारांना खतपाणी घालण्याचे प्रकारही तिथेच होत आहेत. शिक्षण विभागाने याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
विद्यार्थी नसताना 80 टक्के हजेरी
शहरांमध्ये खासगी क्लासेस किंवा अॅकॅडमीत शिकणारे विद्यार्थी वर्षभर कॉलेजमध्ये येत नाहीत. मात्र, ऑफर देणार्या काही महाविद्यालयांत हजेरी पटावर त्यांची पुरेशी हजेरी लावली जाते. त्यांना थेट बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षेलाच बोलवले जाते. प्रात्यक्षिक परीक्षेसह त्यांना बोर्ड परीक्षेचे पेपर देताना गैरप्रकार करून मदत केली जाते.







