
प्रवीण दशरथ बांदेकर3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
तिन्ही सांजेनंतर विसर्जनाची वेळ जवळ यायची तशी उरातली कालवाकालव वाढत जायची. विसर्जनाआधीची आरती आटोपली की, अस्वस्थता पूर्ण देहामनाला लपेटून टाकायची. शेवटी बाप्पा नदीत दिसेनासे होऊन रिकामा चौरंग वा पाट डोईवर घेऊन घराच्या दिशेने पावलं परतायची, तेव्हा भरून आलेल्या डोळ्यांना पायांखालची वाटही दिसत नसे. सगळं आवरून आता उद्यापासून पुन्हा रोजचं रुक्ष व्यावहारिक जगणं जगण्यासाठी निघायचं आहे, हा विचारही अस्वस्थतेत भर घालत राहायचा. आता यातलं काहीच उरलेलं नाही…
उत्सव संपला आहे. पण, उत्सव संपताना येणारी ती एक प्रकारची चमत्कारिक हुरहूर मात्र आता अजिबात जाणवत नाहीय. खरं तर गेल्या काही वर्षांपासूनच असा अनुभव येऊ लागला आहे. खूप उत्साहानं आणि प्रचंड ऊर्जा संपवून, महत्त्वाचा वेळ खर्चून निर्माण केलेलं काही आपल्याच हातानं विसर्जित करताना काहीतरी विलक्षण अस्वस्थता वाट्याला यायची. जीवघेण्या कासाविसीचा अनुभव यायचा. पण, ती अस्वस्थता, ती कासाविसीच आताशा संपून गेली आहे. एक प्रकारचा निबरपणा, बथ्थडपणा मनाला व्यापून राहिला आहे. कशाचंच काही वाटू नये, असं काहीतरी होऊ लागलं आहे. नेमकं काय बदललं? कशामुळे असेल हे? आपलं वय वाढत गेल्यामुळे की बाहेरच्या कल्लोळांचा परिणाम म्हणून आपल्या आंतरिक संवेदना करपून जाताहेत हळूहळू, त्यामुळे? काय समजायचं नेमकं?
काल-परवापर्यंत आसपासचं सगळंच किती वेगळं चित्र होतं. सगळे सण आपापल्या तिथी आणि महिने सांभाळून यायचे. ऋतुचक्रही निसर्गानं आखून दिलेल्या मर्यादा पाळत मार्गक्रमण करीत असायचं. धांगडधिंगा घालत कुदणारा नवथर तरण्या वयातला पाऊस थोडा समंजस, शहाण्या, संसारी प्रौढ माणसासारखा वागू लागला की, गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागायची. तोवर सगळीकडं आसपास हिरवंगार झालेलं असायचं. भरभरून ओसंडून वाहणाऱ्या तृप्त नद्या, वहाळ, विहिरी आणि पानांफुलांनी नटलेले डोंगर खुणावू लागत. निसर्गाची ही समृद्धी पांघरून घरोघर गणपतीच्या स्वागताची तयारी केली जात असे. तनामनाला सुखावणारा निसर्गच जणू ऊर्जा आणि उत्साहाची झिलई वाटत असायचा. सगळ्या सणांना या अवतीभोवतीच्या समृद्ध निसर्गाचीच साथ असे.
म्हटलं तर चैत्र शुद्ध पाडव्यापासून निसर्गाचं बोट धरून चालायची सुरुवात होत असावी. डोंगर-रानातून तोडून आणलेल्या बांबूच्या हिरव्यागार ताज्या काठीशिवाय पाडव्याच्या नववर्षाची गुढी कशी उभारता येणार? गुढी सजवायला कडुलिंबाच्या डहाळ्या, चाफ्याच्या फुलांच्या माळा, आंब्याची पानं. तिथून मग पुढं दर एक सणाला वेगवेगळ्या रूपांत निसर्ग आपल्यासोबत वावरताना दिसतो. नागपंचमीला नागोबाला पुजताना नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या हळदीच्या नि पांगाऱ्याच्या पानांत लपेटलेल्या पातोळ्या, गणपतीच्या माटवीची रानफुलांची, रानफळांची विविधरंगी आरास, गौरीला सजवायला आणलेले हळदीचे रोप, रंगीबेरंगी तेरडे, हरणीची पिवळीगर्द नाजूक फुलं, दसऱ्याला दारावर बांधलेलं भाताच्या केसरांचं आंब्याच्या हिरव्यागार पानांत लपेटलेलं तोरण, पहिल्यावहिल्या नव्या तांदळांची खीर, आपट्याची पानं, नवरात्रीतलं घटाघटातलं नवान्न, वेगवेगळ्या धान्यांचं पिवळंधम्म रुजवणं, नरकचतुर्दशीच्या पहाटे ‘गोयंदा गोयंदा..’ ओरडत फोडायची कारेटी आणि नंतर हादडायचे ताज्या भाताचे पोहे, पार अगदी होळीत जाळायच्या आंब्याच्या फांदीपर्यंत.. सगळं काही भोवतालच्या निसर्गाकडूनच घेतलेलं. निसर्गाचं हे देणं वगळलं, तर यातला एकही सण खऱ्या अर्थानं साजरा होऊ नये इतकं हे आपलं निसर्गावलंबी असणं. एका अर्थी सण साजरे करणं म्हणजेच निसर्गाला साजरं करणं. आरास असू दे की शिजवून खाणं, मिरवणं असू दे की जाळून टाकणं, त्याला डावलून कुठलाच उत्सव साजरा होत नव्हता. पण, हे नक्की कुठून आणि कसं बिघडत गेलं असावं? उत्सवांचं बाजारीकरण सुरू झाल्यापासून आपलं निसर्गाचं धरलेलं बोट सुटत गेलं असावं का? की बाजार संस्कृतीवर आधुनिकतेचं आक्रमण वाढत जात नैसर्गिक गोष्टींची जागा थर्माकोल, प्लास्टिक, रंगीबेरंगी, चमचमते इलेक्ट्रिकचे दिवे, अशा गोष्टींनी व्यापायला सुरुवात केल्यापासून आपलंही आक्रसत जाणं सुरू झालं असावं?
बाबांचं बोट धरून लहानपणी गणपतीच्या शाळेत जायचो, ते आठवतंय. लहान-मोठ्या सगळ्या गणेशमूर्ती विलक्षण भुरळ घालत असत. त्यातली ‘आता आपल्याला ही घेऊ या की ती?’ असं करत भांबावून जायला व्हायचं. अमुक एकाच्या सोंडेचं बाकदार वळण मनात भरायचं, तर दुसऱ्याचं ऐटीत लोडाला टेकून बसणं, आणखी कुणाचं बाळरूप मोहात पाडायचं, तर आणखी एखाद्याचं उंदीरमामावर मांड ठोकून बसणं. पुढचे पाच किंवा सात दिवस हे गणपती बाप्पा मग आमच्या घरात विराजमान व्हायचे. मोदक, लाडू, करंज्या, वेगवेगळ्या खिरी, तऱ्हेतऱ्हेच्या रानभाज्या, काळ्या वाटाण्याचं सांबार अशा पारंपरिक चवींच्या कोकणी पदार्थांची रेलचेल असायची. भजनं, आरत्या, फुगड्या, गाऱ्हाणी आणि घराघरांत आलेले चाकरमानी यामुळेही गावागावांतली घरं गजबजलेली असायची. पण विसर्जनाचा दिवस उजाडला की, मनात कालवाकालव सुरू व्हायची. पाच-सात दिवस जपलेलं आपलं काहीतरी आता आपल्यापासून दूर निघून जाणार आहे असं वाटून डोळे डबडबायचे. अनेकदा तर माझ्या रडारडी नि हट्टामुळे बाबांनी गणपतीचं विसर्जन पाच दिवसांऐवजी सात, नऊ वा अकरा दिवसांनी केलेलं होतं. खरं तर वडील किंवा चुलते नोकरी करणारे असल्याने पाच दिवसांची सुटी घेणंही त्यांना परवडत नसे. तरीही माझ्या डोळ्यांतली ती उदासी बघून वडिलांनीही त्रास होत असावा. त्यामुळं नाइलाजानं त्यांनी गणपती जास्त दिवस पुजायला सुरुवात केलेली.
तिन्ही सांजेनंतर विसर्जनाची वेळ जसजशी जवळ येत असे तसतशी उरातली कालवाकालव अधिकच वाढत जायची. विसर्जनाआधीची आरती आटोपली की अस्वस्थता पूर्ण देहामनाला लपेटून टाकायची. शेवटी बाप्पा नदीत दिसेनासे होऊन रिकामा चौरंग वा पाट डोईवर घेऊन घराच्या दिशेने पावलं परतायची, तेव्हा भरून आलेल्या डोळ्यांना पायांखालची वाटही दिसत नसे. अशा वेळी हमखास येणारा पाऊस मदतीला धावून आल्यासारखं वाटायचं. गडद होत जाणारा अंधार आणि पाऊस यामुळे आपली अवस्था कुणाला समजून येण्याचा प्रश्नच उरत नसे. पाच दिवस गजबजलेलं घर शांत होऊन जाई. रिकामं देवघर ओकंबोकं वाटत राही. आरास, सजावट सगळं काढून टाकणंही जिवावर आलेलं असे. सगळं आवरून आता उद्यापासून पुन्हा रोजचं रुक्ष व्यावहारिक जगणं जगण्यासाठी निघायचं आहे हा विचारही अस्वस्थतेत भर घालत राहायचा.
पण आताशा यातलं काहीच उरलेलं नाही. गणपती बाप्पाचं आगमन, त्याची तयारी, सजावट, पूजाअर्चना, आरत्या, भजनं या सगळ्यातच एक प्रकारची कृत्रिमता आली आहे. आधीची ती नैसर्गिक उत्स्फूर्तता कुठं तरी हरवून गेली आहे. उत्सवासाठी सगळ्या अडचणींवर मात करीत गावी जाण्यातला उत्साह संपून गेला आहे. आता काहीच नैसर्गिक उरलेलं नाही असं सतत जाणवत राहातं. शाडूच्या रंगांनी रंगायला मातीची घरं राहिली नाहीत की शेणानं सारवायला मातीच्या जमिनी उरल्या नाहीत. गणपतीच्या पाठीमागची भिंत रंगवावी लागत नाही की माटवीसाठी डोंगरमाळ धुंडाळत रानफुलं, पत्री वगैरे गोळा करावी लागत नाहीत. पारंपरिक चवींच्या उसळी नि भाज्यांबरोबरच पिढ्यान््पिढ्यांच्या फुगड्या नि भजनंही कधीचीच काळाच्या उदरात गडप झालीत. आता ‘माज्या पप्पानी गंपती आनलाय’सारख्या बालिश गाण्यांच्या साथीनं लॉर्ड गणेशा येतात आणि कानठळ्या बसवणाऱ्या डीजे नि ढोल-ताशांच्या तालावर आक्रमकपणे नाचत, गात विसर्जित होतात. ‘पुढच्या वर्षी लवकर याss’ असं सांगितलं नाही तरी ते येणारच असतात, हे आपणही आता चांगलंच ओळखून असतो.
एकूणच, सण आणि उत्सवातली गंमत, उत्कंठा, उत्सुकता सगळं काही आता निघून गेलं आहे. उत्सव साजरा करण्यामागील कारणच संपून गेल्यावर आता उरलं आहे ते फक्त यांत्रिकपणे आंधळी परंपरा अनुसरत राहणं. तुकोबांच्या शब्दांत, बीजमूळ हाती येण्याआधीच नष्ट झाल्यामुळं आता फक्त वायाविण संसार हाकत राहणं एवढीच एक निरर्थक गोष्ट शिल्लक राहिली आहे, असंच राहून राहून मनात येत राहतं.
samwadpravin @gmail.com