
लोकांनी मुस्लिम आणि काश्मीर नागरिकांच्या विरोधात जाऊ नये अशी आमची इच्छा असल्याचं आवाहन हिमांशी नरवाल यांनी केलं आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचे पती नौदल अधिकारी लेफ्टनंट विजय नरवाल शहीद झाले. विजय नरवाल आणि हिमांशी नरवाल पहलगाम येथे हनिमूनसाठी गेले होते. नरवाल यांचं बालपण जिथे गेलं त्या करनाल येथे आयोजित रक्तदान शिबिरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यादरम्यान त्यांची आई आणि पत्नी हिमांशी यांना अश्रू अनावर झाले.
“आम्हाला शांतता आणि न्याय हवा आहे. ज्यांनी त्यांच्यासोबत चुकीचं केलं आहे, त्यांना शिक्षा व्हायला हवी,” अशी मागणी हिमांशी नरवाल यांनी केली आहे. 22 एप्रिलला दहशतवादी झाला त्याच्या एक आठवडा आधीच दोघांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही पहलगाम येथे हनिमून साजरा करण्यासाठी गेले असताना, दहशतवाद्यांनी विजय नरवाल यांना गोळी घालून ठार केलं.
विजय नरवाल यांची बहीण सृष्टीने यावेळी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्यांचे आभार मानले. ती म्हणाली, “रक्तदान करण्यासाठी इतका मोठा प्रवास करुन येथे पोहोचलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानते. आम्हाला अनेकांचे मेसेजही येत आहेत. लोक उत्साहाने या रक्तदान शिबिरात सहभागी झाले आहेत. सरकारनेही खूप काही केलं आहे”. करनाल येथील स्वयंसेवी संस्था नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड अॅक्टिव्हिस्ट्सने (NIFAA) या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून ठार करणार – अमित शाह
“ज्याने कोणी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला आहे, त्याला सोडणार नाही. आम्ही हल्ल्यासाठी जबाबदार प्रत्येकाला शोधून काढू आणि ठार करु. 26 लोकांना ठार करुन आपण जिंकलो असं समजू नका. तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी भाग पाडलं जाईल,” असं अमित शाह यांनी आसामच्या बोडो समुदायाचे नेते उपेंद्र नाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या आणि त्यांच्या नावावर एका रस्त्याला नाव देण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात म्हटलं.
“प्रत्येकाला निवडून निवडून उत्तर दिलं जाईल. हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. देशाच्या प्रत्येक इंचावरून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा निर्धार असून, तो पूर्ण होईल,” असंही ते म्हणाले आहेत.








