रसिक स्पेशल: ‘सायबर युद्धा’चे नवे तंत्र, नवी रणभूमी!

0
19
रसिक स्पेशल:  ‘सायबर युद्धा’चे नवे तंत्र, नवी रणभूमी!




जगभरातील वाढतं संगणकीकरण, त्याला असलेली इंटरनेटची जोड अन् आता मिळालेली ‘एआय’ची साथ यामुळे सायबर युद्धांची व्याप्ती, गांभीर्य नि परिणाम हे सगळंच अधिकाधिक खोल होत चाललं आहे. त्यामुळे भविष्यातील युद्धं केवळ पारंपरिक पद्धतीनं न होता ती ‘सायबर युद्धा’च्या रुपात होतील, असं म्हटलं जातं. पहलगाममधल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं नेमकं काय केलं पाहिजे, याविषयी होणाऱ्या चर्चेतील एक मुद्दा आहे ‘सायबर युद्धा’चा. दृश्य माध्यमांतील नेहमीच्या अतिरंजित आणि भावना भडकावण्याच्या हेतूनं केलेल्या विश्लेषणाला बाजूला ठेवलं, तरी खरोखरच सायबर युद्धाच्या माध्यमातून भारताला काय करणं शक्य आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचवेळी, पाकिस्तानकडून सायबर युद्ध म्हणून नेमकं काय केलं जाऊ शकतं, याचाही अंदाज घेणं आवश्यक आहे. अलीकडच्या काळात ‘सायबर युद्ध’ हा शब्द वारंवार आपल्या कानांवर पडत असला, तरी त्याची नेमकी व्याप्ती किती असू शकते, याचा अंदाज येण्यासाठी आपण आत्तापर्यंत या बाबतीत विविध देशांनी काय केलं आहे, याचा धावता आढावा घेऊ. इराणवरचा ‘स्टक्सनेट हल्ला’ ‘सायबर युद्ध’ हा शब्द प्रथम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला, तो २०१० च्या दशकात. इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचा अमेरिकेला दाट संशय होता. इराणनं मात्र आपण शांततामय कामांसाठी, म्हणजे अणुऊर्जानिर्मितीसाठी युरेनियमशी संबंधित काम करत असल्याचं सांगितलं होतं. इराणचा हा खोटारडेपणा असल्याचा अमेरिकेचा दावा होता. त्यानंतर इराणमधल्या या कामाशी संबंधित असलेल्या संगणक यंत्रणांमध्ये संथपणा आणि बिघाड घडवून आणण्यासाठी अमेरिका व इस्त्रायल यांनी ‘सायबर युद्ध’ घडवल्याचं प्रकरण खूप गाजलं. या संगणकीय हल्ल्यामुळे इराणला आपल्या अणू कार्यक्रमाशी संबंधित असलेलं युरेनियमचं शुद्धीकरण करण्यात अपयश आलं. हे प्रकरण ‘स्टक्सनेट हल्ला’ म्हणून ओळखलं जातं. यामुळेच इंटरनेटच्या माध्यमातून शत्रूशी थेट युद्धभूमीवर न लढताही त्याला जेरीला आणता येतं, हे प्रथमच सिद्ध झालं. रशियाने केली युक्रेनची बत्ती गुल या प्रकारे एका देशातून दुसऱ्या देशात थेट सायबर हल्ले करता येत असतील, तर यातून मोठे धोके निर्माण होऊ शकतात, ही जाणीव झालेली असतानाच त्याचा प्रत्यक्ष अनुभव २०१५-१६ च्या दरम्यान आला. रशियाने सायबर हल्ला करून युक्रेनमधल्या वीजपुरवठा यंत्रणा बंद पाडल्या. यामुळे लाखो युक्रेनी नागरिकांच्या घरांमध्ये अंधार झाला. अर्थात, रशियाने अधिकृतपणे या हल्ल्याची जबाबदारी घेतली नसली, तरी त्यामागे त्याच देशाचा हात असणार, याविषयी अभ्यासकांच्या मनात कुठलीच शंका नव्हती. ‘नॉटपेट्या’ने मागितली खंडणी संगणकांमध्ये घुसून त्यांना ठप्प करून टाकणारं ‘नॉटपेट्या’ नावाचं ‘मॅलवेअर’ २०१७ मध्ये पुन्हा एकदा युक्रेनमध्ये शिरलं. हेसुद्धा रशियाकडूनच आलं होतं, हे वेगळं सांगायला नको. संगणकांमधला सगळा मजकूर अगम्य भाषेत बदलून टाकणाऱ्या या घातक सॉफ्टवेअरनं लवकरच आपला मोर्चा इतर देशांकडेही वळवला. मूळ मजकूर हवा असेल, तर यासाठी बिटकॉइन या आभासी चलनाच्या रूपातली खंडणी हवी असल्याचं या सॉफ्टवेअरनं जाहीर केलं. मर्क, कॅडबरी, फेडेक्स अशा मोठमोठ्या कंपन्यांना याचा जोरदार फटका बसला. फेडेक्स ही जगभरातल्या सामानाची वाहतूक करणारी कंपनी असल्यामुळे हा एका नव्हे, तर अनेक देशांवरचा हल्ला ठरला.
या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली. बहुतांश देशांमध्ये वीजनिर्मिती आणि वितरण, पाणीपुरवठा आणि त्याचं शुद्धीकरणं, कचरा हाताळणं, वाहतूकव्यवस्था आणि तिचं नियंत्रण अशा जवळपास सगळ्याच सार्वजनिक सुविधांमध्ये संगणकीय यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने असा एखादा हल्ला झाला तर काय हाहाकार होईल, या भीतीनं अनेकांचा थरकाप उडाला. उदाहरणार्थ, एखाद्या शहराच्या पाणीपुरवठा विभागानं पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी त्यात ठरावीक प्रमाणात क्लोरिन मिसळण्यासाठीची यंत्रणा संगणकांद्वारे नियंत्रित केलेली असेल आणि यात सायबर हल्ला करून कुणी बिघाड घडवला तर? किंवा प्रचंड वर्दळीच्या रस्त्यांवरची वाहतूक नियंत्रित करत असलेल्या यंत्रणेमध्ये बदल केले तर? एकूण काय, तर जगभरातील वाढतं संगणकीकरण, त्याला असलेली इंटरनेटची जोड आणि आता मिळालेली ‘एआय’ची साथ या त्रिकुटामुळे सायबर युद्धांची व्याप्ती, त्यांचं गांभीर्य आणि त्यांचे परिणाम हे सगळंच अधिकाधिक खोल होत चाललं आहे. सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्यांकडून त्यामध्ये अनेकदा त्रुटी शिल्लक राहतात. या त्रुटींचा शोध घेऊन त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी हल्लेखोर सतत टिपूनच बसलेले असतात. यातूनच हे हल्ले घडतात. आता तर स्वयंचलित गाड्या, इस्पितळांमधली रुग्णसेवा, यंत्रमानवाधारित श्रम अशा गोष्टी अधिकाधिक स्वरूपात दिसत असल्यामुळे या सायबर युद्धांची भीती आणखीनच वाढलेली आहे. त्यापुढे शत्रू देशातील यूट्यूब चॅनलवर बंदी घालणं, तिथली काही फेसबुक किंवा ट्विटर खाती बंद करणं या गोष्टी अगदी बाळबोध वाटाव्यात, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच भविष्यातील युद्धं केवळ पारंपरिक पद्धतीनं न होता ती ‘सायबर युद्धा’च्या रुपात होतील, असं म्हटलं जातं. आणि हे भाकित फारसं चुकीचं नसल्याचं कदाचित येत्या काळात स्पष्टही होईल. सौदी तेल कंपन्यांना इराणने केले ‘टार्गेट’ ज्या इराणवर ‘सायबर युद्ध’ प्रकारचा पहिला जागतिक हल्ला झाला, त्याच इराणनं आपला दुसरा शत्रू सौदी अरेबियावर २०१२ आणि २०१६ मध्ये असाच हल्ला केला. सौदी अरेबियाचं सगळं अर्थकारण तेलावर चालत असल्यामुळे या तेलाच्या व्यवसायालाच काही काळ खिळखिळं करण्याचं धोरण इराणच्या मदतीनं हल्ले करत असलेल्या मंडळींनी अवलंबलं. यासाठी त्यांनी ‘अरामको’ आणि इतर बलाढ्य तेल कंपन्या वापरत असलेल्या संगणकीय यंत्रणांमध्ये बिघाड घडवून आणला. (संपर्कः akahate@gmail.com)



Source link