रसिक स्पेशल: सम्यक सामर्थ्याला धक्का

0
18
रसिक स्पेशल: सम्यक सामर्थ्याला धक्का


डॉ. रोहन चौधरी9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मणिपूरमधील घटनेने भारताच्या ‘सम्यक शक्ती’वरच आघात झाला आहे. केंद्रातील सत्ताधारी मणिपूर प्रकरणात बचावात्मक भूमिकेत असताना, अमेरिका आणि युरोपियन देशांनी मात्र तिथल्या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा विरोधाभास भारताच्या जागतिक प्रभावासाठी नक्कीच भूषणावह नाही. भारताच्या सम्यक शक्तीचा प्रभाव देशाच्या अंतर्गत समाजकारण- राजकारणावर आधारित आहे, तो कुठल्या जागतिक पुरस्कारावरुन ठरत नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.

वर्तमान जागतिक राजकारणातील “सामर्थ्य’ म्हणजे नेमके काय? लष्करी किंवा आर्थिक सामर्थ्यापेक्षा देशाची राजकीय संस्कृती, मानवी मूल्ये आणि सर्वसमावेशक धोरणांतून निर्माण होणाऱ्या सुप्त आकर्षणाला ‘सामर्थ्य’ असे म्हणतात. प्रख्यात अमेरिकन विचारवंत जोसेफ नाइ यांनी जागतिक राजकारणात ‘सॉफ्ट पॉवर’ची अर्थात सम्यक सामर्थ्याची ही संकल्पना मांडली. नाइ यांच्या मते, अमेरिकेने आपल्या सम्यक सामर्थ्याच्या बळावरच जगावर अधिपत्य गाजवले आहे. या संकल्पनेने जागतिक राजकारणात इतका आमूलाग्र बदल झाला की, भारतासारखे देश लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या तुलनेने कमी सामर्थ्यवान असूनही जागतिक राजकारणात प्रभावशाली गणले जाऊ लागले. भारतीय लोकशाही, विविधतेतील एकता, युद्धाऐवजी बुद्धाला दिलेले महत्त्व, रक्तरंजित क्रांतीपेक्षा हरितक्रांतीला दिलेले प्राधान्य, गांधींच्या अहिंसेच्या प्रयोगाचे आजही जगभर असणारे आकर्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सामाजिक न्यायाचा केलेला प्रयोग यांमुळे जगात भारताविषयी आजही आकर्षण आहे. परंतु, हिंसाग्रस्त मणिपूरमधील दोन महिलांची जमावाने विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रसारित झालेल्या चित्रफितीने भारतीयांनाच आपल्या या सम्यक सामर्थ्याची जाणीव आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मणिपूरमध्ये जे झाले त्यावरून हा निष्कर्ष काढणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणे, अशी टीका होऊ शकते. भारताची प्रतिमा मलीन करण्यामागे विदेशी शक्तींचा हात आहे, असा आरोप देखील होऊ शकतो. तसेच ही भारताची अंतर्गत बाब आहे, अशी काहींची भावनाही असू शकते. परंतु, मन हेलावून टाकणारी ही घटना भारतात घडली आहे, हे वास्तव कसे नाकारणार? जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि समाज माध्यमांचा प्रभाव यांमुळे सरहद्दीच्या भिंती कोसळून पडल्या आहेत. अवघे जग एक कुटुंब झाले आहे. त्यामुळे हा नारा फक्त ‘जी-२०’च्या जाहिरातींवर लावण्यासाठी नाही, तर तो प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे, याची जाणीव भारत ही जगातील महत्त्वाची शक्ती आहे, असा प्रचार करणाऱ्यांना असलीच पाहिजे.

मणिपूर प्रकरणात भारतातील राजकीय व्यवस्थेचे तर अक्षरशः धिंडवडे निघत होतेच, परंतु या चित्रफितीमुळे भारताने जगाला दिलेल्या मानवी मूल्यांच्या सोनेरी पानावर अहंकाराच्या, वासनेच्या, विकारांच्या आणि वेदनेच्या छटा उमटल्या आहेत. राजकारणासाठी स्त्रियांचा इतका घृणास्पद वापर स्वातंत्र्योत्तर इतिहासात कदाचित पहिल्यांदाच भारताने अनुभवला असेल. ही इतकी क्रूरता विश्वगुरु होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात का निर्माण झाली असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. २०२४ नंतर भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईलही कदाचित, परंतु भारतीय समाजाच्या अव्यवस्थेचे जे दर्शन जगाला होत आहे, त्याला जबाबदार कोण? नाइ हे ‘सॉफ्ट पॉवर’ या संकल्पनेचे प्रवर्तक असले, तरी बारकाईने निरीक्षण केल्यास भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात याचे प्रतिबिंब आढळून येते. आधी सामाजिक सुधारणा आणि नंतर राजकीय सुधारणा असा आग्रह धरणाऱ्या नेमस्तांचा दृष्टिकोन देखील सामान्य भारतीयांमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही राजकीय मूल्ये बिंबवण्याचा होता. एकदा ही मूल्ये आत्मसात झाली की, राजकीय स्वातंत्र्य उपभोगण्यास समाजमन जास्त सक्षम होईल, अशी त्यांची भावना होती. संविधानाची निर्मिती हा या सम्यक सामर्थ्याचा सर्वोच्च आविष्कार होता. लोकशाही ही निव्वळ शासनप्रणाली नसून ती एक जीवनपद्धती आहे, असे जेव्हा म. गांधी म्हणत तेव्हा त्यांना देखील लोकशाहीवादी अहिंसक समाज अपेक्षित होता. डॉ. आंबेडकरांची सामाजिक न्यायाची संकल्पना ही या सम्यक मूल्यांवरच आधारित होती. पं. नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाचा हेतू अथवा भारताच्या प्रजासत्ताक दिनी इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावणे यांचा हेतूच मुळी भारताच्या सम्यक सामर्थ्याचे दर्शन जगाला करून देणे हा होता.

आपल्या या सम्यक सामर्थ्याचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न भारताने केला. १९१९ मध्ये पॅरिस शांतता परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचे जागतिक राजकारणातील महत्त्व ठासून सांगण्याचे काम लो. टिळक आणि म. गांधी यांनी केले होते. साम्राज्यवादाला विरोध करण्यासाठी १९२७ मध्ये पं. नेहरू स्वतः ‘काँग्रेस ऑफ ओप्रेस्ड् नॅशनॅलिटीज’मध्ये सहभागी झाले होते. लीग ऑफ नेशनचा आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य म्हणूनही भारत सहभागी झाला होता. पं. नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनावरून १९३८ मध्ये चीन-जपान युद्धात द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये बजावलेली वैद्यकीय सेवा ही भारत-चीन यांच्या दीर्घकालीन शत्रुत्वातही मायेची फुंकर घालत आहे. म. गांधींच्या अहिंसेने मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा यांना कसे प्रभावित केले, हे खुद्द या नेत्यांनीच कथन केले. आफ्रिकेतील वर्णद्वेषीविरोधी संघर्षात भारताने घेतलेली भूमिका, दहशतवादाच्या भीषण अनुभवानंतरही कसाबसारख्या दहशतवाद्याला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे दिलेली शिक्षा, कोणत्याही औपचारिक संस्थेत सहभागी न होता आण्विक शस्त्राचा शांततेसाठी केलेला वापर, संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेमध्ये दिलेले अमूल्य योगदान यांमुळे आज भारताचा झेंडा जगभरात डौलाने फडकत आहे.

मणिपूरमधील घटनेने भारताच्या या सम्यक शक्तीवरच आघात झाला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देश सन्मान देऊन गौरवत आहेत, तर दुसरीकडे भारतातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात, अल्पसंख्याकांचे हक्क आणि मानवी अधिकारांच्या रक्षणासाठी पंतप्रधानांच्या उपस्थितीतच जागतिक समुदाय रस्त्यावर उतरत आहे. केंद्रातील सत्ताधारी मणिपूर प्रकरणात बचावात्मक भूमिकेत असताना, अमेरिका आणि युरोपियन देशांनी मात्र तिथल्या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा विरोधाभास भारताच्या जागतिक प्रभावासाठी नक्कीच भूषणावह नाही. भारताच्या सम्यक शक्तीचा प्रभाव देशाच्या अंतर्गत समाजकारण- राजकारणावर आधारित आहे, तो कुठल्या जागतिक पुरस्कारावरुन ठरत नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.

मणिपूरची घटना फक्त हिमनगाचे टोक असून, भारतातील खेड्यापाड्यात हिंसेची शिकार होणाऱ्या महिलांचे प्रमाण कल्पनेपलीकडचे आहे. कामाच्या ठिकाणी, घरगुती हिंसेचे प्रमाणही तितकेच चिंताजनक आहे. या वर्गाला केवळ प्रवासात सूट देऊन आपण त्यांना ‘मानवी’ विकासाच्या परिघात आणत आहोत, अशी इथल्या राज्यकर्त्यांची भावना असेल, तर ती त्यांना लखलाभ! भारताच्या लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण ४८ टक्के आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला आपण सामाजिक न्यायाच्या आणि स्वातंत्र्याच्या परिघाबाहेर ठेवणार असू, आपल्या बहुसंख्याक राजकारणात त्यांचा बळी घेणार असू, तर जागतिक राजकारणात आपण कोणाच्या जिवावर नेतृत्व करणार आहोत? इथली राजकीय व्यवस्था, सामाजिक प्रक्रिया आणि आर्थिक संरचना आपल्याला न्याय देत नाही, अशी भावना या वर्गाची झाली तर त्याची जबाबदारी कोणाची असेल?

मणिपूरसारख्या घटना या समाजातील अशा भावनेला बळकटी देत असतात. या वास्तवाबद्दल मौन धारण करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आजच्या पिढीने गंभीरपणे आपल्या राजकीय वर्तणुकीचे अवलोकन न केल्यास जागतिक राजकारणात नेतृत्व करण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहील. नेतृत्वाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी झोपलेल्यांना तर जागे करावेच लागेल; परंतु झोपेचे सोंग घेतलेल्यांना गदागदा हलवावे लागेल.

संपर्क : 9922989006

rohanvyankatesh@gmail.com



Source link