- Marathi News
- Opinion
- Radhu Karmakar A Better Cinematographer Cinematographer Rasik Article By Rumi Jaffrey
रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक19 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अलीकडेच मी दोन महान कॅमेरामन अशोक मेहता आणि मनमोहन सिंह यांच्याविषयी लिहिले होते. ते वाचून मला अनेकांचे फोन आणि ई मेल आले. काही जण म्हणाले की, सिनेमाच्या निर्मितीमध्ये कॅमेरामनची भूमिका किती महत्त्वाची असते हे आम्हाला समजले, कारण प्रेक्षकांना सिनेमा तोच तर दाखवत असतो. त्यांच्याविषयी आम्हाला माहिती मिळाल्याने खूप बरे वाटले. या प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला की, भारतातील आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील आणखी एका मोठ्या कॅमेरामनबद्दलही आपण लिहिले पाहिजे. त्यांचे नाव आहे राधू करमाकर. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये राधूजींविषयी…
राधूजी महान कॅमेरामन होते. ते राज कपूर यांचा उजवा हातच होते म्हणाना. १९९३ ची ही गोष्ट आहे. मी ऋषी कपूर यांच्या घरी त्यांच्यासोबत बोलत बसलो होतो. तो लँडलाइन फोनचा काळ होता. फोन वाजला आणि तो उचलताच ऋषीजींनी ‘काय?’ असे उद्गार काढले. त्यांच्या बोलण्यावरुन काही वाईट बातमी असणार, हे माझ्या लक्षात आले. त्यांनी फोन ठेवला, त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. मी विचारले, ‘चिंटूजी, सगळे ठीक आहे ना?’ ते रडू लागले. म्हणाले, ‘कार अपघातात राधूजींचे निधन झाले आहे. ते आता आपल्यात नाहीत..’
चिंटूजी खूप भावविवश झाले होते. मी त्यांना पाणी दिले. ते म्हणाले की, पिताजींच्या दोन भक्कम बाजू होत्या. एक राधू करमाकर आणि दुसरे रेकॉर्डिस्ट अल्लाउद्दीन खां साहेब. दोघांनाही अनैसर्गिक मृत्यू आला. बेंगळुरूमध्ये संजय खान यांच्या टिपू सुलतान या मालिकेच्या सेटवर लागलेल्या आगीत भाजल्याने अल्लाउद्दीन खां साहेबांचा मृत्यू झाला होता. राधूजींचा मृत्यू अपघातात झाला.
चिंटूजी मला राधूजींबद्दल सांगत होते. ते म्हणाले की, मी पहिल्यांदा स्वत:ला पडद्यावर पाहिले तेही राधूजींच्या नजरेनेच. ‘मेरा नाम जोकर’ माझा पहिला सिनेमा होता. तो राधूजींनीच शूट केला होता आणि त्यानंतर ज्या सिनेमातून हीरो म्हणून माझे लाँचिंग झाले, त्या ‘बॉबी’चे शूटिंगही त्यांनीच केले होते. अशा अनेक आठवणी चिंटूजींनी सांगितल्या. पुढे एकदा मनमोहनजींनी राधूजींची आठवण जागवली. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’मध्ये मनजी त्यांचे सहायक होते. त्यांनी सांगितले की, या सिमेमात झीनत अमान यांच्या गाण्यात सूर्योदयाचे दृश्य चित्रीत करायचे होते.
सूर्य उगवतोय आणि झीनत चालत येताहेत, असा तो शॉट होता. आम्ही सगळे सहायक आणि लाइटमन पहाटे पाचलाच जावून शॉट रेडी करुन बसलो होतो. झीनत अमान आल्या, तयारही झाल्या. पण, दिग्दर्शक असलेले राज कपूर साहेब आले नव्हते. ते आठ वाजता आले, तोवर सूर्य वर आला होता. त्यामुळे शॉट घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी राधूजींनी पुन्हा सगळी तयारी केली, राज साहेब पुन्हा आठ वाजता आले आणि म्हणाले, ‘अरे राधू, रात्री झोप येत नव्हती..’ राज कपूर साहेबांना सकाळी उठायला थोडा उशीर होतो, हे सगळ्यांना माहीत होते. तिसऱ्या दिवशीही राज साहेब उशिरा आल्यावर राधूजी म्हणाले, आज काहीही झालं तरी मी शॉट घेणारच! राज साहेबांनी ‘कसा काय?’ असं विचारलं.
राधूजी हुशार कॅमेरामन होते. त्यांनी मशीनच्या सहाय्याने हवेत धूर सोडला, त्यामुळे धुके तयार झाले. त्यांच्याकडे एक खास फिल्टर होता. त्यातून ते थोड्या लाल, निळ्या रंगांचा वापर करत. हा फिल्टर लावून आणि आसमंतात सोडलेल्या धुरातून त्यांनी सकाळी आठला असा शॉट घेतला की तो अगदी सूर्योदयाचा वाटावा. हे दृश्य सिनेमात दिसते. राधूजी आपल्या कलेमध्ये असे माहीर होते. यावरुन मला अकमल इमाम यांचा एक शेर आठवतोय…
उंगलियों के हुनर से ऐ ‘अकमल’
शक्ल पाती है चाक पर मिट्टी।
आणखी एक कमालीची गोष्ट. राज कपूर साहेब ‘संगम’ हा पहिला रंगीत सिनेमा बनवत होते. त्यावेळी भारतात रंगीत फिल्मविषयी फारसे जाणकार लोक नव्हते. राधूजींनीही रंगीत फिल्मचे काम केले नव्हते. त्यामुळे राज साहेबांनी हॉलीवूडमधील एका मोठ्या कॅमेरामनशी संपर्क साधला आणि आपण पहिला रंगीत सिनेमा बनवत आहोत आणि तुम्ही तो करावा, असे सांगितले. त्या कॅमेरामनने उत्तर दिले की, आधी तुमचा एखादा सिनेमा मला पाठवा. तुम्ही कसे दिग्दर्शन करता, ते मला पाहू द्या. त्यानंतरच मी निर्णय घेईन.
मग राज साहेबांनी ‘श्री ४२०’ची प्रिंट पाठवली. त्या कॅमेरामनकडून पत्र आले. त्यांनी लिहिले होते की, तुमच्या कॅमेरामनने जे लाइटिंग वापरले आहे, जो अँगल लावला आहे आणि ज्या प्रकारे शूट केले आहे, त्यावरुन वाटतेय की ते माझ्यापेक्षाही उत्तम कॅमेरामन आहेत. त्यांना फक्त कलर टेक्नॉलॉजी शिकावी लागेल. माझ्याकडे दोन महिन्यांसाठी त्यांना पाठवा, मी कलरच्या सगळ्या गोष्टी शिकवतो. राधूजींनी त्यांच्याकडे पाठवण्यात आले. तिथून शिकून ते परत आले आणि त्यानंतर ‘संगम’चे शूटिंग झाले.
हॉलीवूडच्या कॅमेरामनचे ते पत्र आर. के. स्टुडिओत ठेवले होते. पण, स्टुडिओला लागलेल्या आगीत हे पत्रही जळाले. राज कपूर साहेबांनी राधूजींना दिग्दर्शक म्हणूनही काम दिले. त्या सिनेमाचे नाव होते ‘जिस देश में गंगा बहती है’. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. आज राधूजींच्या स्मृतींमध्ये ‘जिस देश में गंगा बहती है’मधील हे गाणे ऐका…
होंठों पे सच्चाई रहती है,
जहां दिल में सफाई रहती है,
हम उस देश के वासी हैं,
जिस देश में गंगा बहती है…
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.




