
- Marathi News
- Opinion
- Nihalani Was So Impressed By The Inamdars; Inamdar Passed Away While Watching India Sri Lanka Match
रूमी जाफरी1 तासापूर्वी
- कॉपी लिंक
आजच्या रविवारसाठी कोणत्या विषयावर कॉलम लिहावा, याचा विचार करत असताना शफी इनामदार यांची मला आठवण झाली. परवाच २३ ऑक्टोबरला त्यांचा जन्मदिवस होता. त्यामुळे माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये त्यांच्याविषयीच तुम्हाला काही सांगावे, असे मनात आले.
शफी इनामदार हे मूळचे कोकणी होते. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये त्यांचा जन्म झाला. पण, नंतर ते मुंबईत आले आणि त्यांचे संपूर्ण शिक्षण तिथेच झाले. त्यांनी गुजराती रंगभूमी गाजवली. पुढे ते पृथ्वी थिएटरमध्ये आले. ते ‘इप्टा’मध्ये दाखल झाले आणि त्यांच्या अभिनयाचा प्रवास असाच पुढे सरकत गेला. ते एक अष्टपैलू अभिनेता होते. ‘इप्टा’मध्ये आल्यावर ते बलराज साहनींच्या व्यक्तिमत्त्वाने, त्यांच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले. त्यांनी बलराजजींना रंगभूमीवरील आपला आदर्श मानले. चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांप्रमाणेच दिलीपकुमार हे त्यांचेही आवडते अभिनेते होते. पृथ्वी थिएटरमध्ये त्यांचा अभिनय पाहून शशी कपूर साहेब खूप प्रभावित झाले. त्यावेळी ते “विजेता’ या सिनेमाची निर्मिती करत होते. त्याचे दिग्दर्शक होते गोविंद निहलानी. शशीजींनी ‘विजेता’मध्ये शफीजींना भूमिका दिली. त्यांनी त्यात इतकं अप्रतिम काम केलं की, त्यामुळे प्रभावित होऊन गोविंद निहलानींसारख्या महान दिग्दर्शकाने त्यांना आपल्या ‘अर्धसत्य’ या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका दिली. तिथून शफी इनामदार यांच्या अभिनयाचा जो प्रवास सुरू झाला, तो पुढे जात राहिला. त्यांनी अनेक सुंदर आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या सगळ्या व्यक्तिरेखा लोकांच्या कायम लक्षात राहिल्या.
त्यानंतर १९८० च्या दशकात दूरदर्शनवर “ये जो है जिंदगी’ नावाची एक मालिका आली. मला आजही आठवतेय की, त्यावेळी टीव्ही पाहणारे देशभरातील कोणीही त्या मालिकेचा एकही भाग चुकवत नव्हते. राकेश बेदी, स्वरूप संपत आणि शफी इनामदार यांच्या व्यक्तिरेखा जणू घराघरातील सदस्य बनल्या होत्या. सगळे जण त्या पात्रांचे, विशेषतः शफी इनामदारांचे चाहते झाले होते. त्या काळी साधारणपणे कोणत्याही टीव्ही मालिकेचे खूप कमी एपिसोड बनवले जायचे. पण, या मालिकेचे जवळपास ६० वा ६५ भाग बनवण्यात आले होते. ही मालिका दर शुक्रवारी रात्री सादर व्हायची. त्यामुळे सिनेमांचे वितरक चिंतेत असायचे, कारण त्या दिवशी कितीही चांगला सिनेमा लागला, तरी लोक “ये जो है जिंदगी’मुळे थिएटरकडे फिरकायचेही नाहीत. परिणामी शुक्रवारी सिनेमांचा गल्ला कमी व्हायचा. ही होती “ये जो हैं जिंदगी’ची क्रेझ. असो.
त्यानंतर शफी इनामदार काम करत राहिले. माझी त्यांच्याशी पहिली भेट बिरला मातोश्रीमध्ये झाली होती. मी त्यांचे ‘अदा’ हे नाटक पाहायला गेलो होतो. हे नाटक आणि त्यातील त्यांचा अभिनय दोन्ही अप्रतिम होते. नाटकनंतर मी त्यांना ग्रीन रुममध्ये भेटायला गेलो. माझ्यासोबत जे होते, त्यांनी माझी ओळख करून दिली. मी त्यांच्यापेक्षा २०-२१ वर्षांनी लहान होतो. त्यांनी विचारले, ‘कुठले आहात?’ मी म्हणालो, ‘भोपाळचा..’ मग त्यांनी विचारले की, काय काम केले आहे? मी सांगितले, ‘सर, मी शाळेतील नाटके आणि वादविवाद स्पर्धेतून सुरूवात केली. त्यानंतर नाटकात कामे करत राहिलो, अजूनही करतो आहे.’ हे ऐकून ते अचानक उठले आणि मला मिठी मारुन म्हणाले, ‘मी पण शाळेतील नाटके आणि वादविवाद स्पर्धेनेच सुरुवात केली होती. त्यानंतर मी रंगभूमीवर काम सुरू केले आणि आजपर्यंत करतो आहे. त्यामुळं आपल्यामध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे, तूसुद्धा शाळेत नाटके, वादविवाद स्पर्धा केल्या आहेत आणि मीही केल्या आहेत.’ शफी इनामदारांसारख्या कलाकाराच्या स्मरणार्थ एक शेर आठवतोय…
सलाम उस पर अगर ऐसा कोई फ़नकार हो जाए, सियाही ख़ून बन जाए क़लम तलवार हो जाए।
माझ्यासारख्या एका नवख्या माणसाशी ते इतक्या जिव्हाळ्याने, प्रेमाने भेटले, याचा मला खूप आनंद झाला. पुढे माझा चित्रपट प्रवास सुरू झाला आणि ऋषी कपूर यांच्यामुळे त्यांची पुन्हा भेट झाली. शफी इनामदार हे ऋषी कपूर आणि नाना पाटेकर यांना घेऊन “हम दोनो’ सिनेमाचे दिग्दर्शन करत होते. मग माझ्या त्यांच्याशी भेटी होत राहिल्या आणि आमच्यात चांगली मैत्री झाली. एकेदिवशी मला त्यांचा फोन आला. ही कदाचित १९९५ अखेरची गोष्ट असावी. ते मला म्हणाले की, ‘यार रुमी, तू ऑफिसला ये. मला तुझ्याशी बोलायचंय.’ मी ‘कुठल्या ऑफिसला?’ असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, निर्माता सुधाकर बोकाडेंच्या ऑफिसात ये. मी आधीच सुधाकरजींचा सिनेमा करत होतो आणि तिथेही माझी शफीजींची भेट झाली होती. मी सुधाकरजींच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. सीमा सोसायटी चार बंगला इथे हे ऑफिस होते. तिथे ते मला भेटले. म्हणाले, “यार, एक नाटक आहे, “बा रिटायर झाली.’ मी ‘हम दोनो’ सिनेमानंतर ते बनवण्याचा विचार करतोय. मी सचिन भौमिकजींशी बोललो आहे. ते पटकथा लिहिणार आहेत आणि तू त्याचे संवाद तयार कर. मी म्हणालो की, तुम्ही दिग्दर्शन करत आहात आणि त्या सिनेमासाठी मी लिहिणार नाही, असे होणार नाही. ते म्हणाले, ‘मग ठीक आहे. मी शूटिंग आणि काही कामात अडकलोय, त्यातून मोकळा होईन. मला फक्त तुला सांगायचे होते आणि तुझा होकार हवा होता.’ मी म्हणालो, ‘माझ्याकडून शंभर टक्के ओके आहे, असे समजा.’
त्यानंतर माझी सचिन भौमिक यांच्यासोबत बैठक झाली. आम्ही कथेविषयी चर्चा केली, त्यांनी कथेची संकल्पना सांगितली आणि म्हणाले की, मी जया बच्चन यांना घेण्याचा विचार करतोय. पण, मला कळले नाही की ईश्वराच्या मनात काय होते? तो १३ मार्चचा दिवस होता. ते आपल्या घरात टीव्हीवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट सामना बघत होते. तो पाहात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आपल्याला सोडून या जगातून निघून गेले. पण, त्यांचे कार्य, त्यांची कामगिरी, त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांच्या आणि फिल्म इंडस्ट्रीच्या सदैव सोबत राहतील.
रूमी जाफरी बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक