माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा कमल हसन यांनी जॉनी वॉकरना रिटायरमेंट घेतल्यावरही आपल्या चित्रपटासाठी राजी केले होते…

0
16
माझ्या हिश्श्याचे किस्से:  जेव्हा कमल हसन यांनी जॉनी वॉकरना रिटायरमेंट घेतल्यावरही आपल्या चित्रपटासाठी राजी केले होते…


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘चाची 420’च्या एका दृश्यात कमल हसन यांच्यासमवेत जॉनी वॉकर. हा जॉनी वॉकर यांचा शेवटचा चित्रपट होता, जो मूलत: तमिळ भाषेमध्ये तयार झाला होता.

गेल्या आठवड्यात मी जॉनी वॉकर यांच्याविषयी लिहिले होते. पण, त्यांचे किस्से सदराच्या एका भागात सामावणे शक्य नाही. म्हणूनच आज जॉनी वॉकर यांच्या किश्श्यांचा शिल्लक हिस्सा सांगणार आहे.

माझे जॉनी वॉकर यांच्याशी खूप जवळचे नाते होते. त्यांना माझ्याविषयी खूप जिव्हाळा होता. ते राहायला माझ्या शेजारीच होते. मी त्यावेळी बहुतांश विनोदी चित्रपटच लिहित होतो. जॉनी वाॅकर यांनी आपल्या एखाद्या चित्रपटात भूमिका करावी, अशी प्रत्येक चित्रपट निर्मात्याप्रमाणे माझीही इच्छा होती. मी त्यांना म्हणायचो, ‘जॉनी अंकल, प्लीज माझ्या चित्रपटातही काम करा ना..’ तेव्हा ते मला म्हणायचे, ‘बेटा, मी तर खूप वर्षांपूर्वीच रिटायरमेंट घेतलीय.’

मी त्यांना विचारायचो की, रिटायरमेंट का घेतली? त्यावर ते आपल्या खास विनोदी शैलीत म्हणायचे, ‘तेनझिंग एव्हरेस्ट चढला, तिथं झेंडा फडकावला आणि खाली आला. तो तिथंच बसला असता, तर थंडीत गोठून मेला असता!’ मी एक दिवस त्यांना पुन्हा विचारले, ‘सांगा, तुम्ही रिटायरमेंट का घेतली? कलाकार हा कलाकार असतो. तो मरेपर्यंत रिटायर होत नाही.’ यावर ते म्हणाले, ‘हो, कलाकार कधीच रिटायर होत नाही. पण, या फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलाकारांना लोक रिटायर करतात आणि माझ्यासारखे काही स्वाभिमानी लोक स्वत:च रिटायर होतात.’

मी म्हणालो, ‘ठीक आहे. पण, तुम्ही हा निर्णय कधी, कोठे, कसा आणि का घेतला, ते तरी सांगा.’ त्यावर जॉनी अंकल उत्तरले.. ‘मी दुलाल गुहा यांचा खूप आदर करायचो. माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी ते एक होते. त्यांच्या ‘सागर संगम’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी नाशिकला गेलो होतो. त्यात मिथुन चक्रवर्ती होते. ते त्या काळातील खूप बिझी आणि मोठे स्टार होते. मी शूटिंगच्या ठिकाणी पोहोचलो. मुंबईहून नायकच आला नसल्यामुळे त्याची वाट बघणे सुरू होते. पण, मिथुन आलेच नाही. मी तेथेच बसून राहिलो. शूटिंगही झाले नाही. दुसऱ्या दिवशीही हेच झाले. सगळे मिथुन चक्रवर्तींची वाट पाहात बसले, पण ते आलेच नाही.

पुन्हा शूटिंग रद्द झाले. मी बसल्या बसल्या विचार करीत होतो की ज्या पद्धतीने, ज्या शिस्तीने मी काम केलेे, तसे काही आता राहिलेले नाही. इंडस्ट्रीतील कामाची पद्धत, स्टारची वागणूक असे सगळे काही बदलले आहे. मानसिकदृष्ट्या आपण यामध्ये अॅडजस्ट होऊ शकू की नाही? नाशिकला त्या सेटवर बसून नायकाची वाट पाहत असताना मला वाटले की, आपण काही अशी अॅडजस्टमेंट करू शकणार नाही. त्याच दिवशी रिटायरमेंट घ्यायची ठरवलं. आणि तिथून परत आल्यावर मी निवृत्ती जाहीर केली.’ जॉनी अंकलच्या या स्वाभिमानावरुन मला फरहद शेहज़ाद यांचे दोन शेर आठवताहेत…

ख़्वाबों में गर तेरे,

मेरी ख्वाइश नहीं होगी,

मुझसे तेरी आँखों की

परिस्तिश नहीं होगी।

शोला-ऐ-अना पर हैं

खड़ी दम की इमारत,

जल जाऊँगा जो खून में

ये आतिश नहीं होगी।

असो. इतके विनोदी चित्रपट करूनही मला जॉनी वॉकर अंकलसोबत काम करता आले नाही, याची मला खूप खंत होती, पुढेही राहील. एक दिवस मी घरी असताना जॉनी अंकल यांचा भाचा रफिक काझीने मला फोन केला आणि म्हणाला, “रूमी भाई, जॉनी अंकलच्या बंगल्यावर कोण आलंय माहितीय का?’ मी विचारले, “कोण?’ तर तो म्हणाला, “कमल हसन.’ मी आश्चर्याने उद्गारलो, “काय सांगतोस?’ तो म्हणाला, “हो. खरंच..’ ते दिसतील म्हणून मी माझ्या खिडकीतून बघू लागलो. गाडी उभी होती. नंतर समजले की, कमल हसन जॉनी अंकलची वेळ घेऊन त्यांना भेटायला आले होते. पण, कशासाठी भेटायचेय ते सांगितले नव्हते.

आल्यावर त्यांनी सांगितले की, मी एक चित्रपट बनवतोय आणि त्यात तुम्ही भूमिका करावी, असे मला वाटते. त्यावेळी जॉनी अंकल म्हणाले होते की, मी आपल्या अगदी खास लोकांनाही रिटायरमेंट घेतल्याचे सांगितले आहे. आता मी कुणासाठीच काम करत नाही.’ कमल हसन म्हणाले, “हो सर, मला माहीत आहे. पण, मी तुमचा होकार घेऊनच परत जायचं, असे ठरवूनच चेन्नईहून आलोय.’

जॉनी अंकलनी समजावले की, मी तुझ्यासाठी काम केले, तर दहा लोक माझ्याकडे येतील आणि कमल हसनचा चित्रपट केला, मग आमचा का नाही, असे विचारतील. त्यावर कमल हसन म्हणाले, “तुम्ही त्यांंना सांगा की मी कमल हसनच्या हिंदी नव्हे, तर तमिळ चित्रपटात काम केलंय. आणि जॉनी वॉकरसारख्या हिंदीतील दिग्गजाने तमिळ चित्रपटातही काम केले आहे, असे सांगण्याची आम्हालाही संधी द्या ना.’ कमल हसनच्या या डायलॉगने जॉनी अंकलचे मन जिंकले आणि त्यानंतर त्यांनी “चाची 420’मध्ये काम केले. हा चित्रपट त्यांच्या रिटायरमेंटनंतरचा शेवटचा आणि तितकाच संस्मरणीय ठरला. जॉनी अंकलच्या आठवणीत त्यांच्या “प्यासा’मधील हे सुपरहिट गाणे ऐका…

सर जो तेरा चकराए,

या दिल डूबा जाए…

आजा प्यारे पास हमारे,

काहे घबराये, काहे घबराये।

स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.



Source link