
रूमी जाफरीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
‘प्यार किए जा’मधील एका दृश्यात ओमप्रकाश यांच्यासमवेत मेहमूद. हे दृश्य हिंदी चित्रपटांमधील विनोदाचे एक अभिजात उदाहरण मानले जाते.
आपल्या इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असे मेहमूदभाई, ज्यांना आम्ही प्रेमाने भाईजान म्हणतो, त्यांचा आज २३ जुलैला स्मृतिदिन आहे. २००३ मध्ये आजच्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मी त्या मोजक्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे, ज्यांना मेहमूदभाईंंना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली.
मेहमूद भाईजान यांचे सचिव नलिन व्होरा यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. माझी एक मानलेली बहीण होती मधुराणीजी आणि त्यांचे पती अब्बासभाई जसदनवाला. त्यांनी मला सांगितले की, मेहमूदभाई मुंबईला शिफ्ट झाले आहेत आणि आता त्यांना अभिनय करायचा आहे. नलिन व्होरा माझ्या घराच्या अगदी समोरच राहत होते, हाही योगायोग होता. माझे घर तळमजल्यावर होते आणि एक छोटीशी बाग होती आणि त्यासमोरच नलिन व्होरा यांचे घर होते. मेहमूद भाईजान जेव्हा कधी नलिन यांच्या घरी यायचे, तेव्हा जाताना किंवा येताना ते आपली टाटा सियारा कार थांबवून हॉर्न वाजवत असत. मी हॉर्न ऐकून बाहेर यायचो आणि ते मला म्हणायचे, “काय लिहितोय..? कादर खानची भूमिका, अनुपम खेरची भूमिका की माझी भूमिका..?’ प्रत्येक वेळी मी त्यांना हसत म्हणायचो, “भाईजान आत या ना..’ पण, ते नेहमी बाहेरच्या बाहेरच निघून जायचे. दरवेळी ते असेच म्हणायचे, “ज्या दिवशी तू माझी भूमिका लिहिशील त्या दिवशी त्याबद्दल चर्चा करण्यासाठी येईन.’ ते मला नेहमी सांगायचे की, मला पैशांसाठी अभिनय करायचा नाही, अभिनय हे माझे वेड आहे, माझे आयुष्य आहे, अभिनयाशिवाय मी जगतोय; पण मी जिवंत नाही असं समज. अभिनय माझा श्वास आहे, माझा आत्मा आहे. तुला एक सांगतो बेटा, मी मेकअपचे सामान उशाशी ठेवूनच झोपतो, कारण त्याच्या वासाची इतक्या वर्षांची सवय झाली आहे. मेकअप आणि स्पीडगमचा वास घेतच मी झोपतो.’
एक दिवस मेहमूद भाईजान यांनी हॉर्न वाजवला आणि नेहमीप्रमाणे मी त्यांना आत येण्यासाठी हट्ट करायला लागलो. दिव्या भारती त्या वेळी माझ्या घरीच होती. मी बाहेर पळत गेल्याचे तिने पाहिले. तिला आश्चर्य वाटले आणि तीही माझ्या मागे धावत आली. दिव्या बाहेर आली आणि समोर मेहमूद भाईजान यांना पाहताच तिने त्यांना नमस्कार केला. मेहमूद भाईजानही दिव्या भारतीला पाहून आश्चर्यचकित झालेे आणि म्हणाले, “ही इथे काय करतेय?’ मी म्हणालो की, ही माझी बहीण आहे, मला राखी बांधते.’ मग दिव्याने भाईजान यांच्यापुढे घरात येण्यासाठी हट्टच धरला. संपूर्ण इंडस्ट्रीला माहीत आहे की, दिव्याने एकदा आग्रह केला की कुणीही तिला नाही म्हणू शकत नाही. मेहमूद भाईजाननीही दिव्याचे ऐकले आणि ते आत आले.
आमच्या घरी जमिनीवर बसण्याची पद्धत होती आणि त्यासाठी खाली गाद्या अंथरलेल्या होत्या. माझ्याकडे एक छोटा रॉकेलचा स्टोव्ह होता. त्यावर मी चहा बनवू लागलो. एवढ्यात दिव्याने मला बाजूला सारत, ‘तुम्ही बसा, मी चहा करते,’ असे सांगितले. मी खाली बसलो आणि मेहमूद भाईजानशी गप्पा मारू लागलो. मी म्हणालो, ‘भाईजान, तुम्ही ‘प्यार किए जा’मध्ये ओमप्रकाशजींसोबत केलेला सीन अतिशय संस्मरणीय सीन आहे.’ कॉमेडी करू इच्छिणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याला कॉमेडीचे टायमिंग शिकायचे असेल, तर हा सीन म्हणजे त्याच्यासाठी एक चांगली शिकवणी आहे. प्रत्येक अभिनेता त्यामधून शिकतो.’ मेहमूद भाईजान म्हणाले, “ते तर आहेच आणि त्यासाठी मला पुरस्कारही मिळाला. पण, त्यात माझ्यापेक्षा उत्तम अभिनय ओमप्रकाशजींनी केला आहे. मी तर फक्त डायलॉग बोललो, पण सीन त्यांच्या अभिनयामुळे उठावदार झाला. नेहमी लक्षात ठेव, डायलॉग म्हणणे म्हणजे अभिनय नव्हे, रिअॅक्ट होणे हा अभिनय आहे. त्यांनी रिअॅक्ट केलेला सीन त्यांचा आहे, माझा नाही. रसिक माझ्यासाठी तो सीन आठवतात आणि मी ओमप्रकाशजींसाठी.’
हे मेहमूद भाईजान यांचे मोठेपण होते. बोलता बोलता त्यांना ‘पडोसन’ चित्रपटातील “मेरी प्यारी बिंदू..’ गाण्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, “खरे तर हे गाणे नव्हते, तर चित्रपटातील डायलॉग होते. मी तिथे शूटिंगच्या वेळी उपस्थित होतो. ‘मेरी प्यारी बिंदू’ या गाण्याचे श्रेय फक्त आणि फक्त किशोरदा यांचे आहेे. रिहर्सल सुरू केल्यावर किशोरकुमार म्हणाले, “मला यात मजा येत नाहीय.. माझे पात्र म्युझिकल आहे, हा माझ्याकडून शिकायला आलाय, तर काहीतरी म्युझिकल असायला हवे..’ आम्ही शूटिंग करत असलेल्या स्टुडिओत रेकॉर्डिंग स्टुडिओही होता. त्याच वेळी सर्वांनी मिळून हे डायलॉग इम्प्रूव्हाइज केले, लिहिले आणि तिथेच रेकॉर्ड केले. मग त्यातूनच गाणे तयार झाले… “मेरी प्यारी बिंदू..’
मला मेहमूद भाईजानकडून किस्से ऐकण्याची संधी मिळाली होती, म्हणून मी ऐकत होतो आणि चहा बनवता बनवता दिव्याही ते ऐकत होती. दिव्याने चहा बनवला, आम्ही प्यायलो. दिव्या अगदी वाईट चहा बनवायची आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे तिने त्या दिवशीही तसाच चहा बनवला होता. पण, तिने जेवढ्या प्रेमाने तो बनवला होता, तेवढ्याच प्रेमाने मेहमूद भाईजान यांनीही तो प्यायला. मला तर प्यावाच लागणार होता. भाईजानना खाली गादीवर बसण्यात अडचण होती, पण तरीही ते बसले होते. ते उठू लागले तेव्हा मी त्यांना हाताचा आधार दिला. त्यांनी मला आणि दिव्याला आशीर्वाद दिला. म्हणाले, “रूमी बेटा, तू फोन आणि गॅसशिवाय राहतो आहेस, तर नक्कीच प्रगती करशील. पण, ही मुलगी जी स्टार असूनही माझ्यासाठी रॉकेलच्या स्टोव्हवर चहा बनवतेय, तीसुद्धा खूप नाव कमावेल. मी मनापासून प्रार्थना करतो की, ईश्वराने तिला नेहमी आनंदी ठेवावे.’
मेहमूद भाईजान यांच्या सन्मानासाठी मला हाफिज जालंधरी यांचा एक शेर आठवतोय…
कोई चाराह नहीं दुआ के सिवा, कोई सुनता नहीं खुदा के सिवा। जाता जाता मेहमूद भाईजान यांनी गादीकडे पाहिले आणि, “यावर तू झोपतो, म्हणजे खरोखर जमिनीशी जोडलेला आहेस,’ असे बोलून आशीर्वाद देऊन ते निघून गेले. त्या वेळी माझा “मिस्टर आशिक’ हा चित्रपट तयार होत होता आणि त्यात मेहमूद भाईजान यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. चित्रपटाच्या शेवटी बिंदूजी यांचे वडील म्हणून ते येतात. मेहमूद भाईजान यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आणि मुमताज यांच्या “प्यार किए जा’ चित्रपटातील गाणे ऐका…
ओ मेरी मैना तू मान ले मेरा कहना… स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.
-रूमी जाफरी
बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक



