माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली : मकरंद पाटील

0
3


Satara ZP Election Result 2026 सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलं यश मिळाल्याचं म्हटलं आहे. सातारा जिल्हा हा कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे मात्र अलीकडची परिस्थिती थोडी वेगळी होती. अजित दादांच्या झालेल्या निधनानंतर पक्षातील कार्यकर्ता थोडा सैरभैर झाला होता. परंतु या जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकत्र झाली आणि त्याचाच हा परिणाम आहे, असं मकरंद पाटील म्हणाले. 

घुसखोरी करणाऱ्यांना जनतेची चपराक : मकरंद पाटील

सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असं मकरंद पाटील यांनी म्हटलं. आमचे मित्र पक्ष भाजप यांनी या आधीच स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. युती एकत्रीकरणाचा विषय त्यांच्याकडूनच संपलेला होता. यानंतर आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये एकत्र चर्चा केली होती. यामुळेच राष्ट्रवादीला एक अपक्ष धरून 21 जागा मिळाल्या आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या यामुळे दोन्ही पक्षांना चांगल्या जागा मिळाल्या, असं मकरंद पाटील यांनी सांगितलं.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एकत्र अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. वरिष्ठ आणि प्रमुख कार्यकर्त्यांचं काय म्हणणे आहे हे जाणून घेऊन कोणासोबत सत्ता स्थापन करायची याचा निर्णय घेऊ, असं मकरंद पाटील म्हणाले.  

मी असेल माझा मतदारसंघ असेल, पाटण मतदारसंघ असेल या ठिकाणी बाहेरच्या मंत्र्यांनी येऊन फार मोठ्या घोषणा केल्या, ज्याला घुसखोरी म्हणतो अशा पद्धतीचा प्रयत्न केला. मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या, सगळं झालं. परंतु आमच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आमच्या पक्षातील सगळे उमेदवार लोकांनी निवडून दिले हिच त्यांना चपराक आहे, असं मकरंद पाटील यांनी म्हटलं.  

शंभूराज देसाई काय म्हणाले? 

पाटणमध्ये देसाई कुटुंबावर प्रेम करणारी जनता आहे.ही जनता आमचे कुटुंब आहे, त्यामुळे आमच्या पाटण मतदारसंघातील जनता अशा लोकांना अजिबात थारा देत नाही.त्यामुळे असे कितीही नेते आले तरी आम्ही त्याची चिंता करत नाही असं उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. या आधी जिल्हा परिषदेत फक्त 3 शिवसेनेचे सदस्य होते.मात्र आता तो आकडा 15 झाला आहे.पाचपट संख्या वाढली आहे.त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना अजून मजबूत करण्याची वाटचाल सुरू आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले. 

भाजपच्या गणेश नाईक यांनी पालकमंत्री देसाई यांना मालकमंत्री अशी टीका केली होती. त्याला देसाई यांनी उत्तर दिलं आहे.ही जनताच माझी मालक आहे.माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी सोबत जिल्हा परिषदेच्या सत्तेत जायचं की नाही या बाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे देसाई यांनी सांगितलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link