सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोररदार पाऊस सुरु आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण तालुक्यांमध्ये देखील पावसानं तुफान बॅटिंग केली आहे. माण तालुक्यात अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर शिंगणापूर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. फलटण तालुक्याला पावसानं तडाखा दिला आहे. फलटण तालुक्यात 251 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या 24 ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले यामुळं प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहनं केलं आहे.
दुष्काळी माणमध्ये पावसाचा हाहाकार
माण तालुक्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.अनेक गावचे संपर्क तुटले आहेत. दहिवडी-फलटण रस्ता, शिंगणापूर- फलटण रस्ता, आंधळी-मलवडी रस्ता, मलवडी-कुळकजाई, राजवडी-बिजवडी या रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.तसेच शिंगणापूर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे.
माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर परिसराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. दिवसभर शिंगणापूर तसेच परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने ओढे,नाले, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. ऐतिहासिक पुष्करतीर्थ तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून तलावाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
फलटणमध्ये 251 मिलीमीटर पावसाची नोंद
दुष्काळी तालुका फलटणला पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. फलटण तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर तब्बल 251 मिमी पावसाची नोंद झाली आहे. फळांंचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुमाळवाडीतील सुप्रसिद्ध धबधबा सुरू झालाय. मात्र त्याच्या सौंदर्यात आता धोका दडलेला आहे. फलटण शहरात मागील दोन दिवसांपासून पाण्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. नागरिक गुडघाभर पाण्यात उभे आणि प्रशासन मात्र निवांत, असं चित्र पाहायला मिळालं. बाणगंगा धरण आता 230 दशलक्ष घनफुटांनी तुडुंब भरलेलं आहे. बाणगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढतेय. धरणातून विसर्ग झाल्यास शहराला आणि लोकोस्तीतील नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.प्रशासनाने नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
24 ठिकाणी पुलांवरुन पाणी
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बानगंगा नदीने पूर रेषा ओलांडल्याने नदीलगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यावेळी फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी देखील ज्या ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी केली आहे. नदी, ओढे, नाल्याद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे 24 ठिकाणी छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. यामधील एक पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश नागरिकांना दिले आहेत.
अधिक पाहा..