डायरीची पाने: माडीतलं वाचन

0
10
डायरीची पाने:  माडीतलं वाचन


इंद्रजित भालेराव9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ती माडी, तिथल्या देवळीतली त्याची पुस्तकं, तिथं ठेवलेली शेतीची अवजारं अन् बाजेवर वाचत पडलेला तो.. हाच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा ठेवा!

पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट.. एक गाव असतं. त्या गावात एक माडी असते. तिची उंची तशी थोडी असते. वर हात केला की जोडणीला लागतो. तिथं पंखा वगैरे काही नसतं. अजून गावात लाइटच आलेली नसते. उघड्या दारातून अन् खिडकीतून भरपूर हवा नि प्रकाश येत असतो. माडी हौसेनं बांधलेली असते, पण तिच्यात कोणी राहत नाही. अडगळीच्या खोलीसारखं शेतात कधीमधी लागणारं आणि एरवी पडूनच राहणारं सगळं सामान त्या माडीत ठेवलेलं असतं. हे सामान म्हणजे या माडीचंच भाग्य असतं किंवा त्या सामानाचंच भाग्य असतं की, त्याला माडीत राहायला मिळतं.

घरात एक मुलगा असतो. तो शिकत असतो, वाचत असतो. वाचतो म्हणजे अभ्यासाची पुस्तकं नव्हे, तर ती सोडून इतर काहीबाही वाचत असतो. कथा, कविता, कादंबऱ्या, चरित्रं.. त्यात प्रामुख्यानं शेतीमातीच्या पुस्तकांचा भरणा जास्त. कारण त्याचं अनुभवविश्व शेतीमातीशी जोडलेलं.. मग तो व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, बहिणाबाई चौधरी, रा. रं. बोराडे, ना. धों. महानोर, भास्कर चंदनशिव अशा कितीतरी साहित्यिकांची पुस्तकं वाचतो. विकत घेऊन त्यांचा संग्रह करत असतो. माडीत एक बाज रिकामीच पडलेली असते. ती त्याच्या मालकीची होऊन जाते. त्या बाजेवर अंथरूण आणि उशी नसली तरी चालतं. बाजेच्या सुंभाचे वण त्याच्या पाठीला, दंडाला, पोटऱ्यांना पडतात, पण त्याच्या ते लक्षातही येत नाही. तो वाचण्यात इतका रंगून गेलेला असतो की, आडांग बदलायचंही भान त्याला राहत नाही. तहानभूक विसरून तो वाचत असतो. आई खालून जेवणासाठी हाका मारत असते. त्याही त्याला ऐकू येत नाहीत. तो हातातलं वाचन संपल्याशिवाय थांबत नाही. पुस्तक वाचून झाल्यावर मगच तो जेवायला जातो.

घरातली सगळी माणसं रानामाळात कामाला गेलेली असतात. भाऊ – भावजया रानावनात पांगलेले असतात. बाप तालुक्याच्या गावी काहीतरी काम काढून निघून गेलेला असतो. आई एकटीच घरी असते. तिला आपल्या या पोराची काळजी वाटत असते. शाळेची पुस्तकं सोडून हा हे काय वाचत बसलाय? अशी तिला चिंता. घरातली आणि गावातली इतर मुलं परीक्षा संपली की, पुन्हा शाळा सुरू होईपर्यंत पुस्तकांकडं ढुंकून बघत नाहीत. शाळा सुरू झाली की सांदीकुंदीत हरवलेली पुस्तकं शोधत बसतात. पण, याचं परीक्षा संपल्यावर वाचन सुरू होतं. काय वाचतो? कशासाठी वाचतो? याचा फायदा काय? माहीत नाही, पण वाचत राहतो.

अशा वाचनामुळं डोकं सरकलेल्या गावातल्या अन् तिच्या माहेरच्या एक-दोन मुलांची उदाहरणं आईला माहीत असतात. त्यामुळं तिला आपल्या मुलाची चिंता वाटत असते. गावातल्या मुलांना वेगवेगळी व्यसनं लागलेली तिनं पाहिलेली असतात. पण, हे असं मुलखावेगळं वाचनाचं व्यसन तिनं कधी पाहिलेलं नसतं. हा पुस्तकापायी वेडा होतो, हे व्यसनच की! याला पुस्तकाशिवाय दुसरं काही सुधरंत नाही, हा पुस्तकाच्या बाहेर डोकं काढत नाही, नुसतं वाचत असतो.. याचं कसं होईल? याला कोण बायको देईल? याचा संसार कसा काठाला लागंल? याची तिला चिंता वाटते. गावजेवणाच्या सार्वजनिक पंक्तीला जा म्हटलं, तर हा जात नाही, लाज वाटते म्हणतो.

आता लोकांमध्ये मिसळायचं, त्यांच्यासोबत जेवायचं यात कसली आली लाज? पण, हा मुलगा वेगळाच. कशाचाच हट्ट धरत नाही, काहीच मागत नाही. फक्त अधूनमधून पुस्तकांसाठी पैसे मागतो. नाही दिले तरी आग्रह करत नाही. मास्तरांकडून, वाचनालयातून पुस्तकं आणून वाचत राहतो. त्याच्यासारखं वाचन करणारा त्याला कुणी भेटत नाही आणि इतरांसारखं इतर गोष्टीत रमणं त्याला जमत नाही. त्यामुळं हा एकलकोंडा झाला आहे. तो आणि पुस्तक, एवढंच त्याचं जग आहे. या पुस्तकातून त्याला कुठला आनंद मिळतो, हे आईच्या समजण्याच्या बाहेरचं असतं. त्यामुळं तिला तो आनंदी आहे, हेही कळत नाही. तिला फक्त हा सगळ्यांसारखा नाही, म्हणून याचं कसं होईल, हीच चिंता सतावत असते.

गावातला पीठ मागायला येणारा गोसावी, आठवड्याला एकदा येणारा पोस्टमन आणि घरात अधूनमधून येणारे साधुसंत हेच याचे सगेसोयरे. त्यांना मात्र हा भरभरून बोलत असतो. काहीबाही सांगत असतो. तेही त्याचं ऐकत असतात. त्याला काही सांगत असतात. त्याच्या वाचनवेडाचं या लोकांना कौतुक, त्यामुळं तो त्यांच्यात रमतो. वाचलेल्या पुस्तकातलं काहीतरी त्यांना सांगतो. तेच त्याला सखेसहोदर वाटतात. उलट घरात येणारे पाहुणेरावळे, सख्खं गणगोत मात्र त्याला नकोसं वाटतं. कारण त्या सगळ्यांना याचं हे असं वागणं विक्षिप्त वाटतं. त्याच्या वाचनात कुणालाही रस नसतो. त्यामुळं त्यालाही त्या कुणामध्ये रस नसतो. कारण, या लोकांशी काय बोलावं, हे त्याला कळत नाही. तो सहज काही बोलायला गेला, तर त्याला सगळे वेड्यात काढतात. याला व्यवहारातलं काही कळत नाही, म्हणून नेहमीच हिणवतात. त्यामुळं तो त्यांच्यापासून आणखीनच दूर आणि पुस्तकांच्या जवळ जात राहतो.

त्याची ती माडी, तिथल्या देवळीतली त्याची पुस्तकं, तिथं ठेवलेल्या शेतीच्या अवजारांचं ते सगळं प्रदर्शन, त्या बाजेवर वाचत पडलेला तो.. हाच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा ठेवा! हा आनंद तो मनसोक्त उपभोगत असतो. त्यातूनच त्याला त्याच्या आयुष्याचा मार्ग आखायचा असतो. त्याला मराठीचा प्राध्यापक व्हायचं असतं. त्यासाठी खूप वाचन सुरू असतं. त्याचे शिक्षक – प्राध्यापक त्याच्यावर खुश असतात. त्याला हवी ती पुस्तकं देतात, मार्गदर्शन करतात. शिदोरी बांधून आणावी तशा पुस्तकाच्या पिशव्या त्यांच्याकडून भरून आणत असतो. ही शिदोरी संपली की, तो पुन्हा त्यांच्याकडं, तर कधी कॉलेजच्या किंवा तालुक्याच्या ग्रंथालयात जातो. आपल्याला काय काय हवं, ते तिथून आणत असतो.

…आणि एक दिवस तो प्राध्यापक होतो. चांगल्या पगाराची नोकरी मिळते. तो काळ असा असतो की, नोकरीसाठी पैसे लागत नसत. पगारही चांगले वाढलेले असतात. हे सगळं समजल्यावर त्याच्याशी सगळ्यांचंच वागणं बदलतं. त्याच्यासाठी सोयरिकी येतात. आधी ढुंकूनही न पाहणारे लोक त्याच्याभोवती गोळा होतात. पण, त्याला त्यांच्याविषयी काहीही वाटत नाही. आपण एका वेडात वावरत होतो, ते वेड समजून घेणारे गावातले पीठ मागणारे गोसावी, आठवड्यात एकदा घरी येणारा पोस्टमन आणि अधूनमधून घरात येणारे साधुसंत हेच त्याला आपले आत्मीय सोयरे वाटत असतात. आतून काळजी करणारी आई तर खूप आत, अगदी काळजात ठाण मांडून बसलेली असते. बाकीचे सगळे संधिसाधू…

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link