
अरविंद जगताप9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मामाने निर्णय घेण्याआधी नवीनच समस्या सुरू झाली होती. दोन-चार दिवसांपासून खानावळीत चपाती आणि भात पुरत नव्हता. मुलं आरडाओरडा करत होती…
चांगले दिवस होते. कॉलेजचे दिवस. विकास आणि मित्र बाहेरून शिकायला आलेले. हॉस्टेलवर राहायचे. कॉलेजची खानावळ होती. मराठी माणूस चालवायचा. विश्वासमामा नाव त्याचं. मामा तसा वरवर रागीट, पण मनाने निर्मळ. स्वच्छता त्याचा जीव का प्राण! कुणी ताटात खरकटं टाकलेलं मामाला अजिबात आवडायचं नाही. आठवडाभर खानावळीचे पैसे उशिरा दिले, तरी मामा एवढं रागावत नाही जेवढं ताटात टाकल्यावर रागावतो. मुलांना शिस्त असावी, चांगलं अन्न मिळावं, असा मनापासून विचार करणारा एक दुर्मिळ खानावळवाला म्हणजे मामा. मामाने आणखी एक भारी गोष्ट केली होती. अभ्यासात बरी आणि गरजू मुलं शोधून त्यांना तो खानावळीचा हिशेब ठेवण्याचं काम द्यायचा. दोन मुलांना तरी हे काम मिळायचं. त्या बदल्यात खानावळीची फी माफ व्हायची.
बरीच मुलं प्रयत्न करायची. पण, निवड मामाच्या हातात होती. आणि हीच एक अडचणीची गोष्ट होती. ज्यांची निवड व्हायची नाही ते मनोमन नाराज असायचे. कारण मामा वारकरी माणूस. हिशेबात कच्चा म्हणण्यापेक्षा निष्काळजी. त्यामुळं घोळ करायला भरपूर संधी. आधी काही सिनिअर पोरांनी जेवणासोबत दारूचाही खर्च भागवला. एकाने बाईकचे हफ्ते भरले वर्षभर.. मामाचा असा निष्काळजी मामला. कारभार सोपवून मोकळे. कारण त्यांना सगळा उत्साह स्वयंपाक आणि भाजीपाला खरेदीत. आवडीची भाजी मिळावी म्हणून अडून बसणार. पोरांनी पालेभाजी खावी म्हणून तळमळ…
…तर मामाने खानावळीसाठी दोघांची निवड केली. विकास आणि तुषार. काही दिवस बरं चाललं. पण, नंतर खटके उडू लागले. दोन गट पडले. विकासाचे मित्र म्हणू लागले विकास एकटाच पुरे आहे हिशेब करायला. तुषारचे मित्र म्हणू लागले, आम्हाला चांगल्या पोळ्या मिळत नाहीत. खरं तर असं काही कारण नव्हतं. दोघांचे दोन चार खादाडखाऊ मित्र या भांडणाला कारण होते. भांडण वाढलं. एवढं वाढलं की, एक दिवस जोरदार बाचाबाची झाली. विकास मामाला फोन करून म्हणाला, ‘मी एकटाच सांभाळतो सगळा हिशेब.’ तुषार पण मामाला भेटला आणि म्हणाला, ‘मी बघतो हिशेब. निदान एक वेळचा..’ मामाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘दोघांनी आपापसात मिटवा,’ म्हणाला. पण, दोघांनी ऐकलं नाही. मामाला राग आला. त्याने दोघांना काढून टाकलं. तुषारने खानावळ सोडून दिली आणि बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊ लागला. त्याला परवडू शकत होतं. पण, विकासने तसं केलं नाही. त्याला खानावळवाल्या मामाचा खूप राग आला होता. पण, लवकर सगळं विसरून तो शांतपणे खानावळीत जेवत राहिला.
विकास त्या दिवसापासून मामाशी फार बोलायचा नाही. पण, खानावळीत जेवणाऱ्या इतर मुलांशी मात्र भरपूर बोलू लागला. इकडच्या-तिकडच्या गप्पा मारू लागला. सगळे नीट जेवताहेत की नाही बघत होता. आग्रह करत होता. मामाचं लक्ष होतंच. विकास बोलत नसला, तरी त्याच्यात झालेला बदल मामाच्या लक्षात येत होता. आधी एकटाच राहणारा, चिडचिड करणारा विकास एकदम वेगळा झाला होता. मनमोकळा. एकेकाळी ज्यांच्याकडं बघायचा नाही, त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन गप्पा मारत होता. इतर मुलंही त्याच्या वागण्यानं सुखावली होती. एक तर अशी काही मुलं होती, जी जेवणावर तुटून पडायची. बाकी सगळे त्यांना हसायचे. पण, ती चार – दोन मुलं त्याकडं दुर्लक्ष करून अक्षरशः जेवणाचा फडशा पाडायची. विकास आता त्यांचा आवडता मित्र झाला. तशी मामाची खाणावळ भरपेट जेवणाची होती. लिमिटेड काही नव्हतं. जेवढ खायचं तेवढं खा, फक्त उष्ट टाकू नका, ही एकच अट.
विकास आता जेवण्यापेक्षा इतर मुलं कसं जेवतात, ते बघत बसायचा. रात्री उशिरापर्यंत खानावळीत बसून राहायचा. मामाला काही अडचण नव्हती. तो आता मनात विचार करू लागला की, उगीच काढलं आपण विकासला.. त्याला कामाची गरज असणार.. हौस असणार. नाही तर कोण अभ्यास सोडून खानावळीत एवढा वेळ देतो? तो विचार करत होता की, पुन्हा विकासला हिशेबाचं काम देऊ.
पण, काही निर्णय घेण्याआधी नवीनच समस्या सुरू झाली होती. दोन-चार दिवसांपासून खानावळीत चपाती आणि भात पुरत नव्हता. मुलं आरडाओरडा करत होती. मामाने लक्ष घातलं. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की, विकासने भरपूर खाणारे मेंबर गोळा केले होते. त्या सगळ्यांचा तो लीडर झाला होता. त्याच्या सांगण्यावरून सगळे मुद्दाम डबल जेवू लागले. नवीन तीन – चार मेंबर तर चारपट खाणारे होते. सगळे विकासाचे खास. मामाने आजवर कधी कुणाला ‘कमी खा’ म्हणून सांगितलं नव्हतं. इथून पुढं सांगायचा प्रश्न नव्हता. ते मामाच्या स्वभावात नव्हतं. पण, तिथंच घोळ झाला. खूप नुकसान होऊ लागलं. तक्रारी येऊ लागल्या. शेवटी कॉलेजने मामाचं कंत्राट रद्द केलं. मामाही तोटा झेलू शकत नव्हता. सोडून गेला.
विकासचा मोठा विजय झाला. मग तिथं एक गुजराती कंत्राटदार आला. त्यानं विकासकडं हिशेब सोपवण्याचा प्रश्नच नव्हता. तो पक्का हिशेबी असल्यानं त्याने सगळा कारभार स्वतःकडं ठेवला. दोन-तीन मुलं ठेवली. कोण किती चपात्या खातो? कोण किती भात खातो? हे ती मुलं मोजायची. आणि त्याची यादी द्यायची. मग अशा मुलांना खानावळीतून काढायला सुरूवात झाली. जेवण आपोआप लिमिटेड झालं. त्यात ते मराठी पद्धतीचं नसल्यानं मजाही गेली.
विकास अजूनही खानावळीत जातो. चपातीचे फुलके झालेत. ते पण घशाखाली उतरत नाहीत. पण, त्याने गोळा केलेले खादाडखाऊ तेही मजेत खात राहतात. कारण नवीन मालकाने त्यांनाच चपात्या मोजायला ठेवलंय. आता विकासला वाटतं, मामा बरे होते. पण, वेळ निघून गेली. शेवटी हिशेब हातात नसेल, तर विजय पण पराजय वाटू लागतो…
(संपर्कः jarvindas30@gmail.com)