खलनिग्रहणाय: गुन्हेगारी आणि पारंपरिक मूल्ये

0
15
खलनिग्रहणाय:  गुन्हेगारी आणि पारंपरिक मूल्ये


डॉ. भूषणकुमार उपाध्याय5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपली जुनी समाजव्यवस्था तुटून गेली, पण जी नवीन व्यवस्था आली, ती तेवढी प्रभावशाली नाही. त्यामुळे गुन्हेगारीच्या मुळावर इलाज करण्यासाठी भारतीय ज्ञान-परंपरा जोपासत, प्रासंगिक गोष्टींचे पुनरुज्जीवन करावे लागेल. संस्कारांची परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधला, तर समाजातील गुन्हे निश्चित कमी होतील.

समाजामध्ये दिवसेंदिवस सर्वच प्रकारच्या गुन्हेगारीची वाढ होत आहे. त्यातही महिलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे अत्यंत चिंताजनक आहेत. त्याचवेळी सायबर फ्रॉडने उच्छाद मांडला आहे. आर्थिक गुन्हांचा विळखाही वाढत आहे. एकीकडे गुन्हे नियंत्रणात पोलिसांची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे सर्व न्यायालयांमध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हे प्रलंबित आहेत. अशा पार्श्वभूमीवर समाजात गुन्हे का घडतात, याचा याविषयी अनेक मते मांडली जातात.

काही तज्ज्ञ सांगतात की, आर्थिक कारणामुळे गुन्हे घडतात. काहींच्या मते गुन्हे घडण्याचे कारण सामाजिक असते. आणखी काही जण सांगतात की त्यामागे मानसशास्त्रीय कारणे असतात, तर काहींना गुन्हे घडण्यामागे सांप्रदायिक उन्माद हेही कारण असल्याचे वाटते. गुन्ह्यांचे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, प्रासंगिकतेनुसार ही सगळी कारणे कुठे ना कुठे लागू होतात. पण, सगळ्यात महत्त्वाचे कारण माणसाच्या जडणघडणीत दडलेले असते. या जडणघडणीलाच भारतीय संस्कृतीमध्ये ‘संस्कार’ म्हणतात. लहानपणापासून माणूस जे बघतो आणि अनुभवतो, त्या गोष्टी त्याच्या मेंदूवर कायमच्या कोरल्या जातात आणि भविष्यात त्याची वागणूकही त्यानुसारच घडत जाते.

भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे आणि ती वैश्विक मूल्यांवर आधारित आहे. या संस्कृतीमध्ये सर्वांच्या भल्याची कामना करण्यात आलीआहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा या संस्कृतीचा उद्घोष आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा संस्कृतीचा आत्मा आहे. स्त्रीला या संस्कृतीने देवी मानले आहे. कर्माच्या सिद्धांताप्रमाणे जो जसे करेल, तसे भरेल हाही या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. योग, ध्यानधारणेतून मनाच्या आणि शरीराच्या शुद्धीचा मार्ग सांगण्यात आला आहे. आज जगभरात योग करणाऱ्यांची संख्या काही कोटींवर पोहोचली आहे. संयुक्त परिवार ही भारताची एक प्राचीन परंपरा आहे. काका, मामा, मावसा या सर्व नात्यांसाठी इंग्रजीमध्ये जसा ‘अंकल’ हा एकच शब्द आहे; तसा काकू, मावशी, आत्या, मामी या सर्वांसाठीही एकच शब्द आहे- आंटी. पण, भारतीय संस्कृतीने प्रत्येक नात्याला एक वेगळे नाव दिले आहे. ही संस्कृती आध्यात्मिक आहे. ती भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंदला जास्त महत्त्व देते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंवर कसे नियंत्रण ठेवता येईल, याचा साकल्याने विचार करण्यात आला आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्मयोग हे मनाच्या शुद्धीचे मार्ग आहेत आणि ते आपापल्या पद्धतीने माणसाला ईश्वराजवळ नेतात, अशी या संस्कृतीची धारणा आहे.

अशा या भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आत्मसंयम आहे. आत्मसंयम म्हणजे मनावर ताबा मिळवणे. तो कसा मिळवावा, यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. इंद्रियनिग्रह हा अशा आत्मसंयमाचाच भाग आहे. आत्मसंयम वाढवण्यासाठीच आपल्याकडे जप, व्रत, उपवास केले जातात. भारताच्या प्रत्येक भागामध्ये अशा अनेक प्रथा कोणत्या ना कोणत्या रुपाने रुजलेल्या आहेत.

भारत हा आध्यात्मिक पाया असलेला देश आहे. त्यामुळे साहजिकच आध्यात्मिक साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळापासून या साधनेद्वारे आत्मा आणि परमात्म्याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी विशाल आणि व्यापक बनली आहे. ही संस्कृती सगळीकडे ईश्वराचे अस्तित्व असल्याचे मानते. अगदी दगड-माती, झाडे-वेली, नदी-सागर, पक्षी-प्राणी या सर्वांची पूजा केली जाते. त्यामुळे दयाभाव हे या संस्कृतीचे मूळ आहे. षड् आस्तिक दर्शन वेगवेगळ्या पद्धतीने सत्याचे वर्णन करते. एकम् सद् विप्रा बहुधा वदन्ति। या उक्तीप्रमाणे असे मानले जाते की, सत्य एकच आहे, विद्वान लोक ते विविध प्रकारे मांडतात.

गुन्हेगारी मानसिकता वाढू नये म्हणून भारतीय जीवनपद्धतीचे हे सगळे संस्कार आपल्या शिक्षण पद्धतीत समाविष्ट होणे गरजेचे आहे. इंग्रजांनी जी शिक्षण पद्धत लागू केली, ती पूर्णपणे भौतिकवादी दृष्टिकोनावर आधारित आहे. या शिक्षण पद्धतीमुळे भारताची अस्मिताच अस्तित्वहीन झाली आहे. शिक्षण एक चांगले चारित्र्य निर्माण करते. स्वस्थ शरीर, विकसित मन आणि नैतिक भावना या शिक्षण पद्धतीचे मूलाधार आहेत. शिक्षण माणसामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करते. त्यामुळे लहान वयातच कायद्यांचे पालन करणे शिकवायला हवे. संविधान सर्वोच्च आहे आणि त्याचे पालन करणे आपले आद्यकर्तव्य आहे, ही गोष्ट सर्व मुलांच्या मनात रुजवली पाहिजे. लहानपणापासून मुलांना खेळण्याची संधी द्यायला हवी. कारण मैदानी खेळ हा फक्त शारीरिक व्यायाम नसून मानसिक विकासाचेही ते मोठे माध्यम आहे. मनामध्ये असलेले ताणतणाव खेळाने दूर होतात. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, योगाभ्यासामुळे एक संतुलित व्यक्तिमत्व विकसित होते. भावनेवर बुद्धीचा ताबा असला की माणसाचा तोल जात नाही आणि आपल्या मनावर त्याचे पूर्ण नियंत्रण राहते. भविष्यात गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखण्यासाठी मनावरचे नियंत्रण हा सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे.

आपली जुनी समाजव्यवस्था तुटून गेली, पण जी नवीन व्यवस्था आली, ती तेवढी प्रभावशाली नाही. त्यामुळे गुन्हेगारीच्या मुळावर इलाज करण्यासाठी भारतीय ज्ञान-परंपरा जोपासत, सध्या प्रासंगिक असलेल्या गोष्टींचे पुनरुज्जीवन करावे लागेल. संस्कारांची परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधला, तर समाजातील गुन्हे काही प्रमाणात निश्चितच कमी होतील.

नैतिकता खालावली, तणाव वाढला पूर्वी गावागावांत रामायण, महाभारत, भागवतकथा तसेच ज्ञानेश्वरी, तुकारामगाथेवर कीर्तन-प्रवचने व्हायची. त्यातून चांगले काय आणि वाईट काय, याचे ज्ञान होत मनांवर सुसंस्कार व्हायचे. या संस्कारांचा समाजव्यवस्थेवर मोठा पगडा होता. जीवनशैलीही साधारण होती. साधे जीवन आणि उच्च विचार हा सिद्धांत रुढ होता. आता बदलत्या काळात ही परंपरा जवळपास बंद झाली आहे. परिणामी नैतिकतेची पातळी खालावली आहे आणि त्यातूनच गावोगावी तणाव वाढत आहे. अशा गोष्टीही गुन्हेगारी वाढण्याला कारणीभूत ठरत आहेत.

(संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)



Source link