केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारी कर्मचारी गावाखेड्यातून ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा चित्ररथ घेऊन फिरत आहेत. परंतु बऱ्याच गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गेल्यानंतर वाद निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. काही गावांमध्ये तर सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून शिव्या ऐकाव्या लागत आहेत. काही गावांमध्ये भारत संकल्प यात्रेच्या रथावर लोकांकडून दगडफेकीचे प्रकार झाले आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परभणी जिल्ह्यातील काही कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या यात्रेत सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे.





