काँग्रेसकडून झाल्या चुकांची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी काय म्हणाले? अनेक संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य

0
1
काँग्रेसकडून झाल्या चुकांची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी काय म्हणाले? अनेक संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य


Rahul Gandhi News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच काँग्रेस पक्षाकडून झालेल्या चुका आणि तत्सम काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी तणावग्रस्त परिस्थितीमध्ये एक पक्ष म्हणून काँग्रेसनं काही चुकीच्या भूमिका घेतल्या. अर्थात त्या वेळी आपण पक्षाचा भाग नव्हतो. मात्र त्या चुकांची जबाबदारी मात्र आपण स्वीकारतो असं त्यांनी सांगितलं. 1980 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचंच होतं असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. 

अमेरिकेतील ब्राउन विश्वविद्यालयातील ‘वॉटसन इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स’मध्ये आयोजित एका संवादसत्रादरम्यान त्यांनी ही वक्तव्य केली. याच कार्यक्रमातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर भारतीय माध्यमांमध्ये त्यासंदर्भातील चर्चांना वाव मिळाला. 

काय म्हणाले राहुल गांधी? 

अमेरिकेतील या कार्यक्रमामध्ये एका शीख विद्यार्थ्याने 1984 मध्ये झालेल्या हिंसेवरून प्रश्न उपस्थित करत या समुदायाशी ताळमेळ साधण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? असा प्रश्न केला. यावेळी विद्यार्थ्यानं राहुल गांधी यांच्या गतवेळीच्या अमेरिका दौऱ्याचा उल्लेख  करत त्यांच्या यापूर्वीच्या वक्तव्याचीसुद्धा आठवण करून दिली. या प्रश्नावर विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. 

‘मला नाही वाटत की, शीखांना कोणत्या गोष्टीचं भय आहे. मी जे वक्तव्य केलं होतं त्याच मी असं म्हणालो होतो की, खरंच आपल्याला असा भारत देश हवा आहे जिथं नागरिकांना आपल्या धर्माविषयी व्यक्त होतानाही संकोचलेपणा वाटेल? राहिला मुद्दा काँग्रेसच्या चुकांचा, तर त्यातल्या अनेक चुका तेव्हा झाल्या जेव्हा मी पक्षाचा भाग नव्हतो. मात्र, काँग्रेस पक्षानं गतवर्षांमध्ये ज्या काही चुका केल्या आहेत त्यांची जबाबदारी मी पूर्णपणे स्वीकारतो.’

80 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचच

80 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचच होतं असं मी अनेकदा जाहीरपणे म्हणालो आहे असं म्हणताना आपण स्वत: अनेकदा सुवर्ण मंदिराला भेट दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतात शीख समुदायाशी आपलं असणारं चांगलं नातं अधोरेखित करताना त्यांनी आपली भूमिक मांडली. त्यांच्या याच व्हिडीओतील काही भाग भाजपनं हेरला आणि या पक्षातील आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींना तो विद्यार्थी निष्कारण भीती पसरवणाऱ्या त्या वक्तव्याची आठवण करून देत असल्याची भूमिका मांडली. 

या कार्यक्रमादरम्यान प्रभू श्रीरामाचा उल्लेख पौराणिक व्यक्ती म्हणून केल्यानंही भाजपनं राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. आपलं मत मांडताना ते म्हणाले होते, ‘सर्वच महान राजनैतिक विचारवंत, समाजसुधारक गुरू नानक, कर्नाचकातील बसवेश्वर, केरळातील नारायण गुरू, फुले, महात्मा गांधी, आंबेडकर हे सर्वजण तुम्हाला एका दृष्टीकोनातून पाहतात. यापैकी कोणीच कट्टरतावादी नाही. किंबहुना आपल्या संविधानातच म्हटलंय की, सत्य आणि अहिंसाच कायमच सर्वांना सोबत घेऊन पुढे जातात.’

भाजपच्या भूमिकेला मी कधीच हिंदू विचार मानत नाही- राहुल गांधी

आपल्यासाठी ही मूल्य भारतीय परंपरा आणि भारतीय इतिहासाचा आधार आहेत असं सांगताना मी अशा एकाही व्यक्तीला ओळखत नाही, ज्याचा आपण महान मानतो आणि जो वरील गटांमध्ये मोडत नाही. ‘आपली सर्वच पौराणिक व्यक्तीत्वं, अगदी प्रभू श्रीरामही तसेच होते. ते दयावान होते, क्षमाशील होते. त्यामुळं भाजपच्या भूमिकेला मी कधीच हिंदू विचार मानत नाही. मी स्वत: हिंदू विचारसरणीला अधिक बहुलवादी आणि अधिक आपलेपणाची मानतो. अधिक स्नेही, सहिष्णू आणि उदारमतवादी मानतो’, असं राहुल गांधी म्हणाले होते. 

दरम्यान, राहुल यांनी प्रभू श्रीरामांचा ‘पौराणिक व्यक्तिमत्त्व’ म्हणून उल्लेख केल्यावरून ‘राहुल गांधी आणि काँग्रेसने जगभरातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेची खिल्ली उडवणं थांबवावं’, असं म्हणत त्यांच्यासारखे लोक आणि राजकीय पक्ष येतील, जातील; पण प्रभू श्रीराम कायम धर्माचे कालातीत प्रतीक आणि प्रेरणास्थान राहतील असा सूर मालवीय यांनी आळवत काँग्रेस नेत्यांवर टीकेची झोड उठवली. 





Source link