‘उजनी’तील पळसनाथ मंदीर खुले होण्याच्या मार्गावर

0
1
‘उजनी’तील पळसनाथ मंदीर खुले होण्याच्या मार्गावर


इंदापूर :उजनी धरणातील पाण्याचा चलसाठा यावर्षी लवकरच संपुष्टात येऊन मृतसाठ्यातीलही पाणीसाठा आज उणे बावीस टक्के झाला आहे. सोलापूर, सांगोला ,मंगळवेढा आदी ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रातूनच पाणी सोडण्यात आले .मृतसाठ्यातील पाणीसाठाही लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत .उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सत्तेचाळीस वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेल्या अनेक गावांच्या पाऊलखुणा स्पष्ट उघड्या पडू लागल्या आहेत.

पळसदेव तालुका इंदापूर येथील उजनी धरणाच्या जलाशयामध्ये जलमय झालेले प्राचीन श्री. पळसनाथाचे मंदिर उघडे पडू लागले असून लवकरच ते पूर्णपणे खुले होण्याच्या मार्गावर आहे.एक हजार वर्षाचा प्राचीन इतिहास लाभलेले हे मंदिर  सत्तेचाळीस वर्ष पाण्यात असंख्य लाटांच्या तडाख्यात राहून आजही दिमाखदार पणे उभे आहे.

हे मंदिर अवर्षणाच्या काळात उघडे पडल्यानंतर अनेक वास्तुशास्त्र अभियंते व कारागीर , इतिहासप्रेमी, विद्यार्थी, भाविक ,पर्यटक , हौशी छायाचित्रकार, पत्रकार या ठिकाणी आवर्जून भेट देतात .पळसदेव गावाला प्राचीन समृद्ध इतिहास आहे. हे गाव पुरातन काळातले असल्याने अनेक प्राचीन मंदिरे या गावांमध्ये अस्तित्वात होती. परंतु सन १९७५-७६ दरम्यान हे पळसदेव गाव उजनी धरणाच्या पाण्यामध्ये संपादित झालं .इंदापूर तालुक्यातील संपादित झालेल्या गावांपैकी सर्वात जास्त काळी कसदार सुपीक जमीन आणि हे प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना असलेल्या अनेक मंदिरासह हे गाव धरणासाठी संपादित झालं. सत्तेचाळीस वर्षापूर्वी हे गाव नवीन गावठाणा मध्ये पुनर्वसित झाले. परंतु आजही जुन्या गावातील वैभवशाली परंपरा असलेल्या प्राचीन पाऊलखुणा स्पष्टपणे दिसतात .

हेही वाचा

हजार वर्षापूर्वी हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले श्री. पळसनाथ मंदिराचे शिखर  प्राचीन इतिहासाची साक्ष देत, आजही उजनी धरणाच्या पाण्यात गेली सत्तेचाळीस वर्ष पाण्याच्या असंख्य लाटांचे तडाखे खाऊन तग धरून उभा आहे .सप्तभुमिज पद्धतीचे हे शिखर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पळसदेव च्या पुलावरून उत्तर बाजूकडे पाहिले असता स्पष्ठ दिसते. मंदिराच्या गर्भगृहामध्ये अत्यंत कोरीव काम, सभामंडप अत्यंत देखणी मांडणी आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले दगडी खांबावर उभा राहिलेले  हे प्राचीन मंदिर सत्तेचाळीस वर्षापूर्वी पाण्याखाली गडप होऊन या मंदिराचे अर्धवट शिखर उघडे राहिले. मंदिराच्या भोवती असणाऱ्या ओवऱ्या व इतर छोटी मंदिरे मंदिराच्या भोवतालचा तट पाण्याखाली गेला. परंतु हे मंदिर आजही तितक्याच दिमाखाने पाण्यामध्ये उभे आहे .

या मंदिराच्या केलेल्या अभ्यासानुसार व या मंदिरामध्ये सापडलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार हे मंदिर हजार वर्षाच्या आसपास बांधण्यात आले . त्यापासून या मंदिराचे मुख्य भागाला कोणत्याही प्रकारचे डागडुजी अथवा पुनर्बांधणी करण्याचा प्रसंग ग्रामस्थांवर आल्याची नोंद नाही. परंतु सत्तेचाळीस वर्षापूर्वी हे मंदिर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात साठी संपादित झाले .नवीन गावठाणा मध्ये ग्रामस्थांनी नवीन श्री. पळसनाथ मंदिर बांधले. परंतु जुन्या मंदिराला त्यातील  दगडालाही ग्रामस्थांनी हात लावला नाही.

पळसदेव मध्ये बांधण्यात आलेले नवीन मंदिर नव्या धाटनीने बांधण्यात आले आहे. केवळ महादेवाची पिंड व नंदीच्या मूर्तीची नवीन मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.गेल्या चार दशकाहून अधिक काळ हे मंदिर ऊन, वारा ,आणि पाऊस आणि पाण्याच्या लाटांचे तडाखे सोसत आजही तितक्याच दिमाखाने उभे आहे. हे मंदिर अवर्षणाच्या दिवसांमध्ये अधून मधून पूर्णपणे खुले होते .यावेळी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक ,वार्ताहर, पुरातन वास्तूप्रेमी, प्राचीन मंदिर अभ्यासक ,विद्यार्थी मोठी गर्दी करतात. अवर्षणाच्या काळामध्ये हे मंदिर उघडे पडल्यानंतर याठिकाणी पर्यटनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.

हेही वाचा

पळसनाथ मंदीराला क दर्जा द्या .

पळसदेव येथील प्राचीन श्री. पळसनाथ मंदिराला तीर्थक्षेत्र व पर्यटन ‘क’ दर्जा देण्यात यावा .अशी मागणी पळसदेवच्या ग्रामस्थांची आहे.
पळसनाथाचे हे प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले हजार वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. जुने मंदिर उजनी धरणाच्या पाण्यात जरी असले तरी ,देशातून मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक दरवर्षी येतात. सध्या श्री. पळसनाथ मंदिराच्या जवळच विश्वनाथाचे मंदिर पुनर्वसनाअभावी अद्यापही पाण्यात आहे .त्या मंदिरावर संपूर्ण रामायणातील प्रसंगातील चित्रे कोरलेले आहेत. श्री. पळसनाथ मंदिराला ‘क’ दर्जा प्राप्त झाल्यावर मिळणाऱ्या निधीतून व सोई सवलतीतून विश्वनाथाच्या मंदिराचे पुनर्वसन करणे शक्य होईल. आणि सध्या नवीन श्री. पळसनाथ मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांच्या सोयीसाठी विविध विकास कामे करता येतील.ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पळसदेव गावाला प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक मंदिरे उजनी धरणामध्ये बुडाली. विश्वनाथाच्या मंदिरावर संपूर्ण रामायणातील महत्त्वाच्या घटना ,मूर्ती स्वरूपामध्ये लावलेल्या आहेत. त्याची पडझड झालेले आहे. या मंदिराचे पुनर्वसन करणे आजही शक्य आहे. तरी या दुर्मिळ हस्तकलेचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी या मंदिराचे पुनर्वसन व्हावे .व नवीन गावात बांधण्यात आलेल्या पळसनाथ मंदिराला ‘क’ दर्जा देण्यात यावा.- शरद पांडुरंग काळे, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत पळसदेव .





Source link