शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री | पुढारी

0
17


सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक असले, तरी राज्य सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. शेतकरी हिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय पूर्वी घेतले असून पुढेही सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी राहील. सातारा जिल्ह्यात पर्यटनाला खूप वाव आहे. त्याद़ृष्टीने पर्यटनाचे अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा खासगी दौरा असून ते दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे मुक्कामी आहेत. गावी जाण्यासाठी मुख्यमंत्री गुरुवारी सायंकाळी मुंबईहून सातार्‍यात दाखल झाले. विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांसोबत चर्चा केली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली होती. या कामामध्ये  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही स्वत: लक्ष घालत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही लक्ष असून त्यांनी या कामाची पहाणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी एक लेन सुरू करण्यात येणार आहे.

महाबळेश्वर येथे झालेल्या बैठकीत महाबळेश्वर, पाचगणी आणि कास याबद्दल ठोस भूमिका घेत सुचना केल्या होत्या. त्याच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांसोबत चर्चा झाली. जिल्ह्यातील तरुणांना नोकरीसाठी मुंबई व इतर शहरांमध्ये जावे लागत आहे. जिल्ह्यात पर्यटन व इतर क्षेत्रांसाठी वाव आहे. त्याचाच भाग कोयना बॅकवॉटरवर पूल करण्यात येत आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून आणखी दोन पुलांना मंजुरी दिली आहे. क्लस्टर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचा समावेश करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मुनावळे येथे स्कूबा डायव्हिंग करण्यात येणार आहे. सिक्युरिटी अ‍ॅक्टचा मुद्दा काढून हे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

महाबळेश्वरमध्ये पर्यटनाला खूप वाव असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. महाबळेश्वरातील रस्ते, पार्किंगच्या समस्या सोडवण्यात येणार आहे. मिनी काश्मिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या तापोळा भागाचा विकास करण्यात येणार आहे. बामणोली, वासोटा भागात पर्यटनाच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सातारा आणि कोकण कनेक्टीव्हिटी व्हावी यासाठीच कोयना बॅक वॉटरवर पुलाचे काम सुरू केले आहे. सातारामार्गे कोकणातून सरळ पश्चिम महाराष्ट्रात दळणवळण वाढावे यासाठी कनेक्टीव्हिटी करण्याचे काम केले जाणार आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती असून टँकरची मागणी असल्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, पावसाचे प्रमाण कमी-जास्त आहे. बर्‍यापैकी पेरण्या झाल्या आहेत. सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍यांच्या पाठिशी राहणारे सरकार आहे. त्यामुळेच निकषात बसवून सर्वांधित नुकसान भरपाई सरकारने दिली आहे. पावसाने सतत होणार्‍या नुकसानीसाठी 1 हजार 500 कोटींचे वाटप करण्यात आले आहे.



Source link