
एकनाथ शिंदे म्हणाले की, मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की,’उद्धव ठाकरे म्हणतात, लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ कधी आणणार? आम्ही युवा प्रशिक्षणातून लाडका भाऊही आणला. परंतु, राज ठाकरे तुमच्यासोबत होते, तेव्हा त्यांनी पक्ष सोडण्यामागचे कारण काय होते?’ असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘१९९५ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या खाद्याला खांदा लावून काम केले. पण जेव्हा राज ठाकरेंना जबाबदारी देण्याची वेळ आली, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मनात सुप्त इच्छा जागृत झाली. जशी आता मुख्यमंत्रीपदाची होती. शिवसेनेत राज ठाकरेंना बाजूला करण्यात आले आणि उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव आणला गेला. पक्षातून हटवल्यानंतरही राज ठाकरेंनी ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे, तिथली जबाबदारी घेतो, असे म्हटले. परंतु, राज ठाकरेंना ते देखील दिले नाही. यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. परंतु, राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी, अशी बाळासाहेबांची इच्छा नव्हती’, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.