
- Marathi News
- Opinion
- Master Raju Was First Selected By Gulzar, Appeared On Screen At The Age Of Five, The Only Child Artist To Win A ‘Filmfare’
रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
ज्यांना सगळे लोक ‘मास्टर राजू’ या नावाने ओळखतात, त्या आज फहीम अंजानी यांच्याविषयी आज मी माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये सांगणार आहे. मला चांगले आठवतेय.. आमच्या लहानपणाच्या काळात आपल्याकडे ज्यांच्या घरात छोटे बाळ असायचे, त्यांना ते मर्फी बेबीसारखे आणि पाच-सहा वर्षांचा मुलगा असेल, तर तो मास्टर राजूसारखा व्हावा, असे वाटायचे. गोड, निरागस असा हा राजू सर्वांचा आवडता होता.
मी राजू यांना, ‘फिल्म इंडस्ट्रीतील कामाची सुरूवात कशी झाली?’ असे विचारले. त्यांनी सांगितले की, आम्ही दक्षिण मुंबईत राहायला होतो. आमच्या गल्लीतील माझ्या वडिलांचे मित्र असलेले एक जण सिनेमासाठी ज्युनिअर आर्टिस्ट पुरवायचे. त्यामुळे शूटिंगमध्ये मुलांची गरज पडायची, तेव्हा ते मलाही घेऊन जायचे. त्यात अभिनय नसायचा. बसायचे, उभे राहायचे असा केवळ प्रेझेन्स असायचा. या प्रकारे मी ‘उपहार’, “अन्नदाता’, ‘बावर्ची’ अशा सिनेमांत ज्युनिअर आर्टिस्ट मुलांमध्ये काम केले होते. याच दरम्यान, गुलजार साहेब ‘किताब’ हा सिनेमा तयार करत होते. त्यासाठी त्यांना एका मुलाची गरज होती. त्या काळात कास्टिंग डायरेक्टर असा काही प्रकार नव्हता. त्यामुळे ज्युनिअर आर्टिस्ट पुरवणारेच मुलांना त्यांच्यासमोर आणून उभे करत होते. आमच्या गल्लीतील सगळ्या मुलांना त्यांनी नेऊन आणले, पण त्यांची निवड झाली नाही. चला, आता राजूलाही घेऊन जाऊ, म्हणून त्यांनी एकेदिवशी मला आईवडिलांसोबत तिकडे नेले. त्यावेळी मी ५-६ वर्षांचा असेन. आम्ही दक्षिण मुंबईतून ट्रेनने बांद्र्याला गेलो आणि तिथे उतरून गुलजार साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. मी पाहिले, तिथे खूप मुले आली होती आणि गुलजार साहेब सगळ्यांशी बोलत होते. कुणी त्यांना एखाद्या हीरोचे मोठमोठे डायलॉग म्हणून दाखवत होता. कुणी अॅक्टिंग, तर कुणी डान्स करुन दाखवत होता. एखादा मुलगा कविताही ऐकवत होता.
राजूनी पुढे सांगितले की, माझा नंबर येईपर्यंत मी खूप कंटाळून गेलो होतो. घरी जायचे म्हणून रडायला लागलो. सगळ्यांचा मूड गेला. गुलजार साहेबही काही बोलले नाहीत. आम्ही घरी आलो. नंतर त्या ज्युनिअर आर्टिस्ट पुरवणाऱ्याला गुलजार साहेबांचा फोन केला आणि ‘त्या मुलाला परत घेऊन या,’ असे त्यांनी सांगितले. मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला बसवले, खायला दिले आणि ‘मला हाच मुलगा हवा,’ असे सांगितले. सगळ्यांना आश्चर्य वाटले की, या मुलाने ना डायलॉग म्हणून दाखवला, ना डान्स करुन दाखवला, ना कविता ऐकवली..
सगळ्यांनी गुलजार साहेबांना विचारले की, तुम्ही याला सिलेक्ट कसे काय केले? त्यावर ते म्हणाले, ‘मला खराखुरा मुलगा हवा आहे. आतापर्यंत मी ज्यांना ज्यांना भेटलो, ते लहान मुले आहेत, असे वाटतच नव्हते. सगळे मोठमोठ्या हीरोंचे डायलॉग म्हणून दाखवताहेत, डान्स करताहेत. ते बालकलाकारापेक्षा एखाद्या तरुणासारखे वाटताहेत. मला असा मुलगा पाहिजे जो दिसण्यात, बोलण्यात मुलगाच वाटेल. ही गोष्ट या मुलात आहे.’ मी त्यांना म्हणालो, ‘पण, मला तर अॅक्टिंग येत नाही..’ त्यावर त्यांनी सांगितले की, हरकत नाही, मी तुला शिकवेन.. त्यांनी मला अॅक्टिंग शिकवली नाही, माझ्याशी मैत्री केली. मला सेटवर घेऊन गेले. दुसरे कलाकार कसे अॅक्टिंग करतात, हे दाखवले. ते प्रत्येक वेळी मला आपल्यासोबत घ्यायचे. त्यांनी मला अशा वातावरणात ठेवले की, आपण अॅक्टिंग शिकतोय हे मला कधी जाणवलेही नाही. त्यामुळे मी शिकत गेलो. गुलजार साहेब असे गुरु होते, ज्यांच्या केवळ सावलीत राहिल्याने मला अॅक्टिंग शिकण्याची वेगळी गरजच पडली नाही. त्यांच्या सहवासामुळे माझ्यामध्ये आपोआप अभिनयगुण उतरला.. या गोष्टीवरुन मला मुनव्वर राणा यांच्या एक शेर आठवतोय…
ख़ुद से चलकर नहीं ये तर्ज़-ए-सुखन आया है पाँव दाबे हैं बुज़र्गों के तो फ़न आया है…
मी लिहिलेल्या ‘पायल’, ‘रंग’ आणि ‘साजन चले ससुराल’ या तीन सिनेमांमध्ये राजूनी अॅक्टिंग केली आहे. मला ‘किताब’ सिनेमातील एक खूप गाजलेला प्रसंग आठवतोय.. केश्तो मुखर्जी मुलांना ए- बी- सी- डी शिकवत असतात. ते त्यांना सांगताहेत.. ए फॉर अॅपल, बी फॉर बॉल.. राजू लहान मुलगा आहे, त्याला खूप जोराची सूसू आल्याने बाथरुमला जायचे आहे. केश्तो मुखर्जी विचारतात.. के फॉर..? राजू तत्काळ म्हणतो, ‘करना है..!’ आणि थिएटरमध्ये जोरदार हंशा पिकतो.
असो. मास्टर राजूने असा इतिहास लिहिला आहे की, मला नाही वाटत तो कोणी बदलू शकेल. ते एकमेव असे अभिनेता आहेत, ज्यांना ‘किताब’साठी उत्कृष्ट बालकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्या वर्षीच फिल्मफेअरमध्ये उत्कृष्ट बालकलाकाराची श्रेणी होती. ती ना त्याच्या आधी होती, ना नंतर कधी होती. एकदाच फिल्मफेअरमध्ये उत्कृष्ट बालकलाकार ही श्रेणी तयार झाली आणि हा पुरस्कार राजूंना मिळाला. त्यानंतर ‘चितचोर’ सिनेमासाठीही राजूंना उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. राजू एकमेव असे कलाकार आहेत, ज्यांनी टीव्ही मालिकांच्या बऱ्याच एपिसोडमध्ये काम केले. तब्बल तीन हजार एपिसोडमध्ये त्यांनी नारदमुनींची भूमिका केली. मजेची गोष्ट म्हणजे, फहीम यांनी ‘मास्टर राजू’ या नावाने अॅक्टिंग सुरू केली होती, आणखी दोन वर्षांनी ते साठ वर्षांचे होतील. पण, त्यांच्या नावामागची ‘मास्टर’ ही उपाधी अजूनही निघालेली नाही आणि कधी निघणारही नाही. आज मास्टर राजूंसाठी ‘किताब’मधील हे गाणे ऐका…
अ आ इ ई, अ आ इ ई..
मास्टरजी की आ गयी चिठ्ठी…
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.