माझ्या हिश्श्याचे किस्से: रेशमा : छुप गए वो साज़-ए-हस्ती छेड़कर; अब तो बस आवाज़ ही आवाज़ है…

0
17
माझ्या हिश्श्याचे किस्से: रेशमा : छुप गए वो साज़-ए-हस्ती छेड़कर; अब तो बस आवाज़ ही आवाज़ है…


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

रेशमाजी म्हणाल्या, ‘मी भारतात आले होते. राज कपूर साहेबांकडे माझा कार्यक्रम होता. तेथे सुभाष घईंनी माझे गाणे ऐकले. त्या वेळेपर्यंत मी त्यांना ओळखतही नव्हते. ते हॉटेलवर आले आणि म्हणाले, ‘माझे नाव सुभाष घई. मला तुम्हाला भेटायचंय.’ मी म्हणाले, ‘मी तर तुम्हाला ओळखतही नाही..’

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी आज तुम्हाला चित्रपटसृष्टीतील एका गायिकेचा किस्सा सांगणार आहे. या गायिकेने एकच गाणे गायिले आणि त्याच गाण्याने त्यांना हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. ही गोष्ट मी मुंबईला जाण्यापूर्वीची आहे. १९८४-८५ मध्ये महेश जोशी हे मध्य प्रदेशचे गृहनिर्माणमंत्री होते. इंदूर येथे राहणारे त्यांचे मोठे बंधू दा साहेबांचा मला फोन आला. ते म्हणाले, ‘दोन दिवसांनी महेशकडे पाकिस्तानहून रेशमा येणार आहे, सिंगर; तिचा कार्यक्रम आहे, तुम्हा सर्वांना यायचंय..’ दा साहेब आणि महेश अंकल आमच्यासाठी कुटुंबाप्रमाणेच होते.

रेशमाजींचा कार्यक्रम ज्या दिवशी संध्याकाळी होता, त्या दिवशी सकाळीच मी महेशजींच्या बंगल्यावर पोहोचलो. तेव्हा महेश अंकल आणि आणखी दोन-तीन जण रेशमाजींसोबत गप्पा मारत होते. मला पाहिल्यावर महेशजींनी रेशमाजींसोबत माझी ओळख करून दिली. मी शांतपणे एका ठिकाणी बसून त्यांचे बोलणे ऐकत होतो. त्या सांगत होत्या, ‘मी तर बंजारन होते. बंजारनचे काय काम असते, तर सगळीकडे फिरणे. एकदा आम्ही कबिल्यामध्ये गात होतो, त्या वेळी कराची रेडिओमध्ये काम करणारे एक साहेब माझे गाणे ऐकून थबकले. नंतर म्हणाले, ‘तुम्ही खूप छान गाता. कराचीला याल तेव्हा मला नक्की भेटा.’ आणि मग मला त्यांनी कार्ड दिले. कराचीला गेल्यावर त्यांना भेटायला गेले. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमधील एका खोलीत नेऊन बसवले आणि म्हणाले, ‘गा..’ मी जराशी धास्तावले होते, पण त्यांच्या आग्रहाला नकार देऊ शकले नाही. नंतर मी गायिलेले ते गाणे ट्रांझिस्टरमध्ये एेकू येऊ लागले. सगळे म्हणू लागले की, हा तर रेशमासारखाच आवाज आहे. मग मला कोणीतरी म्हणाले की, हा रेशमासारखा आवाज नाही, तर रेशमाचाच आवाज आहे. मला तेव्हा पहिल्यांदाच कळले की, त्यांनी त्या दिवशी माझ्याकडून जे गाणे गाऊन घेतले होते, ते त्यांनी त्यांच्या मशीनमध्ये भरले होते. त्याला रेकॉर्डिंग म्हणतात हे मला नंतर समजले. खरं तर मला काहीच माहिती नव्हतं. मला तर उर्दूदेखील नीट येत नव्हती. फक्त पंजाबी यायची आणि राजस्थानात जन्म झाल्यामुळे राजस्थानी येत होती. मी माझ्या मुलांचे वयदेखील ऋतुमानानुसार लक्षात ठेवते. म्हणजे याचा जन्म झाला होता तेव्हा आंब्याचा हंगाम होता. आठ आंब्याचे हंगाम झाले, याचा अर्थ हा आठ वर्षांचा झाला. दुसऱ्याचा जन्म झाला तेव्हा हरभऱ्याचे पीक आले होते. मग हरभऱ्याचे अकरा हंगाम झाले. मुलांचे वय असेच लक्षात ठेवते.’

त्यांचा हा साधेपणा पाहून मी अवाक झालो. एवढी मोठी कलाकार, इतक्या निर्मळ मनाची, इतकी प्रामाणिक आहे. त्यांची विनोदबुद्धीही चांगली होती. मला अजूनही आठवतं, त्या म्हणाल्या, ‘माझ्या कॉलनीत एक साहेब राहत होते. ते जेव्हा कधी मला भेटायचे तेव्हा म्हणायचे की, रेशमाजी, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, माझी खूप इच्छा आहे की, एक दिवस तुम्ही माझ्या घरी यावं आणि माझ्यासमोर बसून गावं.’ मी म्हणाले, ‘हो येईन, नक्की येईन.’ एक दिवस मला राहवले नाही. वाटलं की, हा आपल्यावर इतकं प्रेम करतो, आपला इतका मोठा चाहता आहे, तर याच्या घरी जायलाच हवं. एक दिवस मी त्यांना म्हणाले, ‘जनाब, मी रविवारी तुमच्या घरी येईन आणि गाईन.’ मी त्यांच्या घरी गेले. ते खूप खुश झाले, खूप आदरातिथ्य केले. मी बसले होते तिथे अगदी माझ्यासमोर बसले आणि म्हणाले ‘आता गा..’ मी गाणं सुरू केलं. गाता-गाता माझ्या लक्षात आलं की, हे महाशय समोर बसून डुलक्या घेत होते. मी त्यांना जाग केलं आणि म्हणाले, ‘जनाब, मी गातेय आणि तुम्ही चक्क झोपताय!’ त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, ‘माझा तुमच्यावर विश्वास आहे की, तुम्ही गात राहाल..’ आणि पुन्हा झोपून गेले!’

तर अशी होती रेशमाजींची विनोदबुद्धी. नंतर महेशजींनी त्यांना विचारले की, तुम्हाला ‘हीरो’ चित्रपटातले गाणे कसे मिळाले? त्या म्हणाल्या, ‘मी भारतात आले होते. राज कपूर साहेबांकडे माझा कार्यक्रम होता. तेथे सुभाष घईंनी माझे गाणे ऐकले. त्यावेळेपर्यंत मी त्यांना ओळखतही नव्हते. ते हॉटेलवर आले आणि म्हणाले, ‘माझे नाव सुभाष घई. मला तुम्हाला भेटायचंय.’ मी म्हणाले, ‘मी तर तुम्हाला ओळखतही नाही..’ मग तिथल्या लोकांनी मला ते खूप मोठे दिग्दर्शक आहेत, असे सांगितले. मग ते मला म्हणाले, ‘तुम्हाला माझ्या चित्रपटात गाणं गायचंय.’ मी म्हणाले, ‘चित्रपटात गाणं माझ्यासाठी कठीण आहे.’ पण, त्यांनी खूप आग्रह केला. मला त्यांच्या त्या आग्रहाला नकार देता आला नाही आणि मी तयार झाले. त्यानंतर संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांतजी, प्यारेलालजी आणि ज्यांनी गाणं लिहिलं होतं ते आनंद बक्षी या सर्वांशी माझी भेट झाली. मी रेकॉर्डिंगला पोहोचले, तो माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. मी खूप अवघडले होते. प्यारेलालजी खूप हुशार, समजदार आणि कलाकारांच्या गुणांची कदर करणारे होते. ते म्हणाले, ‘अगदी आरामात गा, माझे म्युझिशियन सगळे सांभाळून घेतील.’ आणि त्यांनी त्यांच्या वादकांना सांगितले, ‘हे बघा, आपल्या हिशेबाने वाजवू नका, रेशमाजी जे गातील, तुम्हाला त्याच हिशेबाने त्यांची साथ द्यायची आहे.’ अशा प्रकारे त्यांनी मला कम्फर्टेबल केले आणि नंतर मी जे गाणे गायले त्याचे सारे श्रेय त्यांनाच जाते. ज्या प्रकारे त्यांनी माझ्याकडून हे गाणे गाऊन घेतले आणि ज्या पद्धतीने रेकॉर्ड केले त्यात फक्त आवाज माझा आहे, जी ईश्वराची देणगी आहे, परंतु लक्ष्मीकांतजी, प्यारेलालजी, बक्षी साहेब आणि सुभाष घईजींनी त्या गाण्याला अशी उंची दिली की काय बोलू? हे गाणे अजरामर झाले. आता तेच गाणे माझी ओळख बनले आहे.’

त्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि रात्री कार्यक्रमाला यायचे म्हणून निघून गेले. परंतु, मी तेथेच थांबलो. थोड्या वेळाने मला आतून गाण्याचा आवाज आला. मी डोकावून पाहिले, तर रेशमाजी रियाज करत होत्या. मला पाहून त्यांनी आत यायला सांगितले. मी गेल्यावर म्हणाल्या, ‘लपून काय ऐकतोयस? बस..’ आणि मी त्या नशीबवान लोकांपैकी एक ठरलो, ज्यांना रेशमाजींना सराव करताना एकटेच बसून ऐकायला मिळालं. आज हे लिहीत असताना मला मजाज़ यांचा एक शेर आठतोय…

छुप गए वो साज़-ए-हस्ती छेड़कर,

अब तो बस आवाज़ ही आवाज़ है।

रेशमाजींचा तो कार्यक्रम भोपाळच्या इतिहासात कायम नोंदवला जाईल. रेशमाजींनी गायलेले ‘हीरो’ चित्रपटातील ‘लंबी जुदाई..’ हे तेच अजरामर गाणे ऐका आणि रेशमाजींना आठवा. चार दिना दा प्यार ओ रब्बा, बड़ी लंबी जुदाई। होठों पे आई तेरी याद, दुहाई।

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link