रूमी जाफरी, लेखक, दिग्दर्शक6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपल्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर चाहत्यांचे अभिवादन स्वीकारताना शाहरुख खान. (संग्रहित छायाचित्र)
आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी शाहरुख खानबद्दल सांगणार आहे, ज्याला चित्रपटसृष्टीतील लोक ‘बादशाह’ या नावानेही ओळखतात. शाहरुख खानच्या वडिलांचे नाव मीर ताज मोहंमद खान होते आणि ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अगदी जवळचे असलेले, आझाद हिंद सेनेचे जनरल शाहनवाज खान यांचे चुलत भाऊ होते. ते स्वत: सर्वात तरुण स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांना ताम्रपटही मिळाला होता.
शाहरुख खान हा असा अभिनेता आहे, ज्याने जगभरात आपल्या देशाचा मान वाढवला. मी शाहरुखला बहुधा १९९१ किंवा १९९२ मध्ये ‘दीवाना’च्या की ‘दिल आशना है’च्या सेटवर भेटलो होतो. मी आणि शाहरुख खान एक चित्रपट करणार होतो, त्याचे दिग्दर्शन कल्पतरू करणार होते. पण हा चित्रपट बनलाच नाही. नंतर शाहरुखसोबत माझा “अंजाम’ हा चित्रपट सुरू झाला. त्यात त्याच्यासोबत माधुरी दीक्षित होती. या चित्रपटासाठी शाहरुखला ‘बेस्ट अॅक्टर इन निगेटिव्ह रोल’चा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मग “हर दिल जो प्यार करेगा’ हा माझा आणखी एक चित्रपट आला. त्यात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. त्यानंतर मी त्याच्या “चलते चलते’ या आणखी एका चित्रपटाची कथा लिहिली. हा त्यांच्या होम प्रॉडक्शनचा चित्रपट होता.
असो. मी पहिल्यांदा शाहरुख खानला भेटलो. तेव्हा थोडा वेळ गप्पा मारल्यावर तो मला म्हणाला की, मला तुमच्याशी बोलताना तुमचा आवाज एनएसडीचे अभिनेता रघुवीर यादव यांच्यासारखा वाटतोय. आजवर इतक्या वर्षांत त्याने मला हे अनेकदा सांगितलंय. तर ‘चलते चलते’च्या शूटिंगसाठी आम्ही ग्रीसला गेलो होतो. अथेन्सहून जहाजाने मॅकेनोज आयलँडकडे निघालो होतो. ४-५ तासांचा प्रवास होता. आम्ही सगळे गप्पा मारत होतो. मी शाहरुखला विचारले की, १० वर्षांपूर्वी तू मला बोलला होतास, तुझा आवाज एेकून मला रघुवीर यादव यांची आठवण येते. तू असं का म्हणाला होता?
यावर शाहरुखने सांगितले, ‘माझे वडील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे कँटीन चालवत होते. अनेकदा माझी शाळा सुटल्यावर मी या कँटीनमध्ये जायचो आणि तिथं काही वेळ थांबायचो. रोहिणी हट्टंगडी, राज बब्बर, अजित वाच्छानी, सुरेखा सिकरी, रघुवीर यादव आणि अशा अनेक मोठ्या कलाकारांना मी रिहर्सल करताना पाहायचो. इब्राहिम अल्काजी हे खूप मोठे नाट्य दिग्दर्शक होते. त्यांच्याजवळ बसून मी अनेक रिहर्सल पाहिल्या, कितीतरी कार्यक्रम पाहिले. या कलाकारांना मी तेव्हापासून ओळखतो. आपण कधी चित्रपटात काम करू, असे त्या वेळी मला स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु ईश्वर आपली पटकथा लिहीत होता. कदाचित त्यालाच भविष्यात मला अभिनेता बनवायचे असावे म्हणून त्याने माझ्या वडिलांना कँटीन मिळवून दिले. मी शाळेतून तिथे जायचो. मोठमोठ्या कलाकरांचा अभिनय पाहायचो. इब्राहिम अल्काजींचे दिग्दर्शन बघायचो. म्हणूनच कदाचित मी पुढे रंगभूमीवर काम केले. नंतर टीव्हीवर आिण मग चित्रपटांमध्ये काम केले.’ त्यानंतर शाहरुख खानने असा इतिहास रचला की, भविष्यात त्याच्या तोडीचे काम करणे कुणासाठीही तितके सोपे नसेल. या गोष्टीवरून अमीर मीनाई यांचा एक शेर आठवतोय…
कश्तियां सब की
किनारे पे पहुंच जाती हैं
नाख़ुदा जिन का नहीं
उन का ख़ुदा होता हैं।
शाहरुख खानच्या “ओम शांती ओम’ या चित्रपटातील एक खूपच प्रसिद्ध डायलॉग आहे- ‘अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।’ शाहरुखच्या बाबतीतही असेच घडले. प्रत्येक पावलावर, प्रत्येक वळणावर जे पाहिजे होते ते त्याने मिळवले. १९९१-९२ ची गोष्ट आहे. बँडस्टँडवर एक बंगला होता. त्याला पारशी बंगला म्हणायचे. माझ्या “रंग’ या चित्रपटाचे शूटिंग तिथेच सुरू होते. त्याच्या जवळच ‘देवदूत’ नावाची एक इमारत आहे. तेथेच अजीज मिर्झा यांच्या फ्लॅटमध्ये शाहरुख राहत होता. एके दिवशी संध्याकाळी शूटिंग सुरू असताना तो तिथे आला. अमृता सिंग त्याला दिल्लीत असल्यापासून ओळखत होती. ती आमच्यासोबत शूटिंग करत असल्याचे समजल्याने तो तिला भेटायला पारशी बंगल्यात आला. हा बंगला खूपच अप्रतिम होता. तो आला. सर्वांना भेटला. गप्पा झाल्या, चहापाणी झाले. मग त्याने संपूर्ण बंगल्यावर नजर फिरवली अन् मला म्हणाला, “रूमी साहेब, एक दिवस मी हा बंगला घेणार!’ शाहरुखच्या या वाक्यावर मी हसून एक जुना जोक मारला.. ‘मी विकणारच नाही, तर तू खरेदी करशील कसा?”
पुढं शाहरुख खानने तो बंगला खरोखरच खरेदी केला. बघा, कदाचित शाहरुख तेव्हा अगदी मनातून आणि जिद्दीने बोलला असावा. आणि म्हणूनच आज त्या बंगल्याचे नाव ‘मन्नत’ आहे. शाहरुखने ‘ओम शांती ओम’मध्ये म्हटलेला.. ‘अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती हैं..’ हा डायलॉग जणू त्याने प्रत्येक पावलावर सिद्ध करून दाखवला. याच गोष्टीवर शाहरुखच्या “येस बॉस’मधील हे गाणं ऐका…
चाँद तारे तोड़ लाऊँ,
सारी दुनिया पर मैं छाऊँ,
बस इतना सा ख्वाब हैं…
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.







