डायरीची पाने: चपलाचोर अन् उसने पाय

0
2
डायरीची पाने:  चपलाचोर अन् उसने पाय


इंद्रजित भालेराव8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नदीतून पाणी पिऊन वर आलो, तर रस्त्यात चपला दिसल्या. ‘या चपला कुणाच्या आहेत?’ म्हणून चौकशी केली. त्या इतक्या सुंदर होत्या की मला त्यांचा मोह पडला…

चप्पल, बूट या पायातल्या वहाणा अलीकडच्या आहेत. जुन्या काळी बूट आणि चप्पलही नव्हती. महिलांसाठी चपला आणि पुरुषांसाठी खेटरं याच तेव्हा वहाणा असायच्या. त्या ना कुठल्या कंपनीनं तयार केलेल्या होत्या ना त्या कुठल्या दुकानात मिळायच्या. गावातल्याच चांभार बांधवानं त्या बनवलेल्या असायच्या. वितीनं आणि बोटानं पायाचं मोजमाप घेतलं जायचं. कोणाचीही वहाण कोणालाही यायची. कारण ती ढळत्या पायाचीच बनवलेली असायची. आमच्या बालपणी लहान मुलांसाठी पायात वहाणच नसायची. त्यामुळं आम्ही अनवाणीच फिरायचो.

वहाण, पायताण हे शब्दही आमच्या लहानपणी गावात प्रचलित नव्हते. खेटरं आणि चपला हेच शब्द वापरात होते. खेटरांना ‘जोडा’ असंही म्हटलं जायचं. या वहाणा बनवताना दोरा वापरला जात नसे. कातड्याची बारीक वादी काढून तो शिवला जायचा. गावाबाहेर कशासाठीही जाण्याची तेव्हा गरज नव्हती. कारण गाव एक परिपूर्ण एकक होतं. गावातल्या गरजा गावातलीच माणसं भागवायची. ज्या वस्तू बनवणारे अलुतेदार बलुतेदार गावात नसत, त्या बनवणारे बाहेरचे लोक गावात येत. त्यासाठीच गावगाड्याची रचना केलेली होती. पण, त्यातून विषमता निर्माण झाल्यामुळं पुढं गावगाडा मोडकळीस आला. ते नव्या युगाला पूरक आणि योग्यच होतं. बापाचा जोडा पोरानं घातला आणि माईच्या चपल्या लेकीनं घातल्या की समजावं आपली लेकरं मोठी झाली आहेत, असा त्याकाळी समज होता. कारण लहानांसाठी पायताण किंवा वहाण नावाचा प्रकारच नव्हता. ती वहाण वापरायच्या वयाची झाली म्हणजे मोठी झाली, असं समजलं जायचं. मग त्यांना लेकरू म्हणून वागवण्याऐवजी बरोबरीने वागवलं जायचं. त्यांच्या लग्नाचा विचार सुरू व्हायचा.

घरातल्या प्रत्येकासाठी तेव्हा वहाण बनवली जात नसे. घरात चार जण असतील, तर दोन किंवा एकच वहाण बनवली जायची आणि ज्याला जास्त गरज आहे तोच ती वापरायचा. घरातले इतर लोक अनवाणी रानावनात काम करताना, फिरताना दिसत. पाहुण्याच्या गावाला जायचं असेल तरच अंगात नेटके कपडे आणि पायात वहाणा घातल्या जायच्या. आजच्यासारखी कपड्यांची आणि पायात घालायच्या वहाणांचीही सहज उपलब्धता नव्हती. पाहुण्याकडे जाताना बऱ्याचदा इतरांकडून शर्ट, फेटा, वहाणा उसन्या मागितल्या जात. कारण बऱ्याच घरी एकही वहाण किंवा फेटा, शर्ट नसायचा. हे सगळं पन्नास वर्षांपूर्वी आमच्या गावात मी पाहिलं आहे. तेव्हा एका अर्थानं गाव आदिम अवस्थेतच जगत होतं. गेल्या पन्नास वर्षात हे सगळं चित्र बदलत गेलं.

हळूहळू परिवर्तन होत आज त्या मानानं वस्तूंची खूपच चंगळ झाली आहे. त्यामुळंच एका लोककथेत पाखरानं सुद्धा अशी पायांची अदलाबदल केलेली दिसते. साळुंकीचे पाय पिवळे जर्द असतात आणि मोराचे पाय काळे असतात. पूर्वी हे उलट होतं. मोराचे पाय सोन्याचे होते आणि साळुंकीचे पाय मात्र काळे होते. एक दिवस साळुंकीला पाहुण्यांच्या घरी जायचं होतं. म्हणून विहीणबाईसमोर रुबाब दाखवण्यासाठी तिनं विनंती करून मोराचे पाय उसने मागितले. मोरानंही उदारपणे तिला ते पाय दिले आणि तोपर्यंत वापरायला म्हणून तिचे काळे पाय घेतले. पण, साळुंकी मोराचे सोन्याचे पाय घेऊन जे उडाली ती परत आलीच नाही. मोर मात्र तिची वाट पाहत राहिला. अजूनही तो साळुंकीची वाट पाहतोच आहे. आभाळ भरून आलं की नाचताना मोर आपल्या पायाकडं पाहतो आणि रडतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळतात. तेच अश्रू लांडोर पिते आणि मग ती गरोदर राहते, असं एका लोककथेत सांगितलं आहे. लहानपणी गावातच आम्ही ही गोष्ट ऐकली होती. गावाला जाताना उसने पायताण घेण्याच्या माणसाच्या या व्यवहारावरूनच लोककथाकाराला ही कथा सुचली असावी, असं मला वाटतं.

मी माझ्या आजोळी, आहेरवाडी नावाच्या गावात शिकायला असताना दुपारच्या सुटीत आम्ही सगळी मुलं थुना नदीवर जेवायला जायचो. एखाद्या झाडाखाली बसून जेवण करायचो. नंतर नदीत पोटभर पाणी पिऊन शाळेत यायचो. एकदा नदीतून पाणी पिऊन वर आलो, तर रस्त्यात सुंदर चपला ठेवलेल्या दिसल्या. ‘या चपला कुणाच्या आहेत?’ म्हणून मी आजूबाजूला चौकशी केली. पण, धोंडी नावाचा मुलगा म्हणाला, ‘त्या इथल्या कुणाच्याच नाहीत, तू घेऊन जा.’ त्या इतक्या सुंदर चपला होत्या की, मला त्यांचा मोह पडला. माझ्या आजोळचा चांभारदादा फार सुंदर कलाकुसरीच्या चपला तयार करायचा. तशाच त्या होत्या. त्यामुळं मी त्या उचलल्या आणि त्याच गावात आपल्या माहेरीच राहणाऱ्या माझ्या वेड्या, विधवा मावशीला नेऊन दिल्या. त्या चपला मावशीला देताना मला आणि घेताना त्या मावशीलाही खूप आनंद झाला होता. त्या आनंदातच मी शाळेत येऊन बसलो.

काही वेळाने वर्ग सुरू असताना अचानक एक बाई अद्वातद्वा शिव्या देत, भांडत शाळेत आली. ‘माझ्या चपला कोणी आणल्या? हीच सगळी मुलं तिथं नदीवर जेवायला आली होती. यांच्याशिवाय तिथं कुणी आलेलंच नव्हतं. यांनीच कुणीतरी आणल्या असणार!’ असं ती म्हणत होती. ते ऐकून मी एकदमच रडायला लागलो. गुरुजींनी मला विचारलं, ‘तुला काय झालं रडायला? तू काय चोर आहेस का?’ तरी मी रडूच लागलो. गुरुजींनी जवळ घेऊन विचारलं, ‘का रडतो आहेस?’ मग मी सांगितलं की, मला त्या धोंडीनं असं असं सांगितलं. म्हणून मी त्या चपला आणल्या आणि मावशीला दिल्या. गुरुजी म्हणाले, ‘जा त्या परत घेऊन ये..’

जड अंत:करणानं मी परत मावशीकडं गेलो आणि तिला चपला परत मागितल्या. तोपर्यंत तिनं त्या चपलांना तेल देऊन ठेवलेलं होतं. देवळीत ठेवलेल्या चपला तिनं माझ्या हातात काढून दिल्यावर मी तशाच त्या उचलून घेऊन आलो. काहीच बोलू शकलो नाही. मावशीला काही म्हणालोही नाही. खाली मान घालून शाळेत आलो आणि खाली मान घालूनच त्या चपला गुरुजींजवळ दिल्या. पुन्हा रडू लागलो. मला खूपच अपराधी वाटत होतं. हा अपराध माझा मलाच सहन होत नव्हता. गुरुजी म्हणाले, ‘वेडा आहेस का? रडतोस कशाला? तू काय मुद्दाम केलंस का? ही सगळी त्या धोंड्याची खोड आहे. त्याला अशा खोड्या करायची सवयच आहे. त्यानंच तुला फसवलं आणि चपला उचलायला लावल्या. त्यानंच त्या तिथं आणून ठेवल्या होत्या, हे मला माहीत आहे, खात्रीनं. त्यामुळं तू कशाला काळजी करतोस?’ मग मी शांत झालो. पण, मला किती तरी दिवस अपराधी वाटतच राहिलं. कारण तो धोंडीच पुढं मला ‘चपला चोर’ म्हणू लागला.



Source link