‘चूक झाली! सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींमुळे…’ सरकारकडून कबुली; पहलगाम हल्ल्यासंदर्भातली खळबळजनक माहिती समोर

0
23
‘चूक झाली! सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींमुळे…’ सरकारकडून कबुली; पहलगाम हल्ल्यासंदर्भातली खळबळजनक माहिती समोर


Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अनेक उच्चस्तरिय बैठका पार पडल्या. त्याचदरम्यान दिल्लीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय बैठक पार पडली. जिथं सर्व पक्षांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. सदर बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren rijiju) यांनी इथं सुरक्षाव्यवस्थेमध्ये त्रुटी असल्यानं मोठी चूक झाल्याची बाब जाहीरपणे स्वीकारली. झाला प्रकार आणि ही घटना नेमकी कशी झाली, कुठे काय चुकलं यासंदर्भातील माहिती यंत्रणांकडून बैठकीमध्ये देण्यात आल्याचं रिजिजू म्हणाले. 

पहलगाम हल्ल्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर 

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यानुसार, ‘तिथं पर्यटक येत होते, नेहमीची कामं सुरू होती. सर्वकाही सुरळीतपणे सुरू होतं आणि या घटनेनं संपूर्ण वातावरण बिघडवलं. सदर प्रकरणी सध्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. एक गोष्ट समोर आली ती म्हणजे देशानं एकजुटीनं दहशकतवादाविरोधात लढा दिला पाहिजे हीच बाब सर्वांनी स्वीकारली. 

आमच्या अधिकाऱ्यांकडून, गुप्तचर यंत्रणेकडून हल्ल्याची माहिती देत घटना कशी झाली आणि नेमक्या कोणत्या त्रुटींमुळं चूक झाली याचीही माहिती दिली. जिथं हा हल्ला झाला, ही घटना घडली ते ठिकाण मुख्य रस्त्यालगत नसून तिथवर पोहोचण्यासाठी पायी जावं लागतं किंवा घोड्यावरून जावं लागतं. तिथून दोन- अडीच तासांच्या पठारावर ही घटना घडली. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाही ही घटना एका चुकीमुळं घडली. असा कोणताही प्रकार पुढे होऊ नये आणि यासाठी नेमकी काय व्यवस्था केली आहे यासंदर्भातील माहिती सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आली’, असं रिजिजू म्हणाले. 

या संघर्षाच्या वेळी सर्व पक्ष आणि संपूर्ण देश एकजुटीनं उभं असून सरकार या संदर्भात जो काही निर्णय घेईल त्याला सर्वांची साथ असेल असा निर्णय या सर्वपक्षीय बैठकीत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या अटीतटीच्या वेळी एकमेकांशी राजकारण न करता एकजुटीनं राहण्याचा संदेश या बैठकीत देण्यात आल्याचं म्हणत पाकिस्तान आणि दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल असा आश्वासक सूरही त्यांनी आळवला. 

 

दरम्यान, या सर्वपक्षीय बैठकीच्या सुरुवातीलाच पहलगाम हल्ल्यातील मृतांना काही क्षणांचं मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीसाठी केंद्राच्या वतीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू, राज्यसभा सदन नेता जे पी नड्डा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 





Source link