काळ सूड उगवतो तेव्हा: पवारांचा कथित ‘खंजीर’ 45 वर्षांनी बूमरँग, वाचा अजितदादांच्या बंडावर शैलेंद्र परांजपे यांचे सडेतोड विश्लेषण!

0
18
काळ सूड उगवतो तेव्हा: पवारांचा कथित ‘खंजीर’ 45 वर्षांनी बूमरँग, वाचा अजितदादांच्या बंडावर शैलेंद्र परांजपे यांचे सडेतोड विश्लेषण!


शैलेंद्र परांजपे20 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

राजकारणात वेळ साधणे महत्त्वाचे असते. सध्या तरी ती अजित पवारांनी साधली आहे. इथं कुणावर कधी काय वेळ येईल, हे सांगता येत नाही आणि तशीच अनाकलनीय वेळ शरद पवारांवर आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत पवार अधिक प्रखरपणे लढतात, हा इतिहास आहे. पण, वय आणि निसर्ग यांना पर्याय नसतो, हे त्यांच्यासारख्या ‘जाणत्या’ म्हणवल्या जाणाऱ्या नेत्याला का मान्य होत नाही, हा प्रश्न आजही कायम आहे. कदाचित त्यामुळेच पवारांचा कथित ‘खंजीर’ ४५ वर्षांनी बूमरँगसारखा उलटला आहे. राजकारणात काळ कधीतरी सूड उगवतो, असे म्हणतात ते अशा गोष्टींमुळेच…

महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात रस घेत शरद पवार या क्षेत्रात आले आणि १९६७ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकले. भारतीय राजकारणात जवळपास सहा दशके (अचूक सांगायचं तर ५६ वर्षे) निवडणूक जिंकून लोकप्रतिनिधी राहिलेले ते कदाचित एकमेव नेते असावेत. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवून आणि तीन वेळा केंद्र सरकारमधील मंत्रिपदावर राहूनही शरद पवारांवर आज ही वेळ का आली असावी..? शरद पवारांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले तेव्हा, पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात खूप गाजला. पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या निधनानंतर, ‘आपण चव्हाणसाहेबांच्या फोनवरून आलेल्या आदेशानुसार वसंतदादांचे सरकार पाडले,’ असा खुलासा केला होता. सामान्यतः शरद पवार हयात नसलेल्या व्यक्तींचे दाखले पुरावे म्हणून देताना दिसतात. पण, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात पहिल्यांदाच ते एक्स्पोज झाले आहेत, तेही त्यांच्या पुतण्याकडून.

पवारांचे १९७८ चे पुलोद सरकार १९८० च्या लाटेत पुन्हा निवडून आलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी बरखास्त केले. त्यावेळी इंदिरा गांधींनी पवारांना, पुन्हा काँग्रेसमधे आलात तर सरकार राखू शकाल, हा पर्याय दिला होता. पण, स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी पवार इंदिरा गांधींबरोबर गेले नाहीत. तेव्हा पवार चाळीस वर्षांचे होते. तेच आता अजित पवार यांनी केले आहे. फक्त इंदिरा गांधींची जागा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली असल्याचे चित्र दिसते आहे. शरद पवारांनी १९८० मध्ये केलेली ती चूक अजित पवार सुधारत आहेत का, हे काळच ठरवेल. पवारांनी तेव्हा भीष्मप्रतिज्ञा केली की, आयुष्यात पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही आणि काही दिवसांत, १९८६ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमधे परतले. १९६७ च्या पहिल्या विधानसभा विजयानंतर त्यांनी ११ वर्षांनी पवारांनी पहिले बंड करीत खंजीर प्रयोग केला. तेव्हा ते आठ-नऊ वर्षांसाठी काँग्रेसबाहेर गेले. १९८६ ला काँग्रेसमध्ये परतले, पण केवळ १२ वर्षांसाठी आणि काँग्रेसमधे काढलेल्या या बारा वर्षात ते तीनदा मुख्यमंत्री झाले. तरीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतःचा नवा पक्ष काढला. त्यामुळे कोण गद्दार, कोण खुद्दार आणि कोण वफादार, हे कोण ठरवणार..? महाराष्ट्राला हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

पवार ५७ वर्षांच्या या कारकिर्दीत २१ वर्षे काँग्रेसबाहेरच होते. स्वातंत्र्योत्तर काळात वारसा हक्काने मिळालेली सत्ता गेली की काँग्रेस पक्षाचे नेते तळमळू लागतात. ते सत्तेबाहेर राहू शकत नाहीत. शरद पवारांचा डीएनए काँग्रेसचाच आहे. अर्थात, त्यांच्या मातोश्री शेकापच्या होत्या, पण ते स्वतः विद्यार्थिदशेपासून काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे पवारांचे राजकारण हे कायमच सत्ताकारण राहिले आहे. काँग्रेसबाहेर गेल्यानंतरही त्यांची स्वतःची अशी काहीही विचारधारा नव्हती. सत्तेत राहिलो तरच भले करू शकतो, यावरच त्यांची निष्ठा आहे. तीच निष्ठा त्यांच्यासमोरून खंजीर चालवलेल्या अजित पवारांनी परवा आपल्या समर्थकांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवली.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा भाजपचे १२२, तर शिवसेनेचे ६३ आमदार विजयी झाले होते. काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. देवेंद्र फडणवीसांचा भाजपमधील नऊ सहकाऱ्यांसह ३१ ऑक्टोबर २०१४ ला वानखेडे स्टेडियमवर शपथविधी झाला, तेव्हा अजित पवारांसह बाकी नेत्यांना त्याठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश शरद पवारांनी दिले होते. शिवसेना सत्तेत सहभागी व्हायला तयार नव्हती, त्यामुळे प्रफुल्ल पटेलांनी ट्विट करून, प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, पण सरकार पडू देणार नाही, हे स्पष्ट केले होते. राज्याला निवडणुका परवडणार नाहीत, यासाठी आपण भाजपने मागितला नसताना बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे पवारांनी त्यावेळी सांगितले होते. पण, दोन वर्षांनी शिवसेना सरकारमध्ये राहूनही रोजच्या रोज भाजपवर टीका करू लागली, तेव्हा भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये, असे विधान करून पवारांनी घूमजाव केले होते. फडणवीसांच्या सरकारमध्ये जाण्यासाठी पवार उतावीळ झाले होते आणि तशी तयारीही त्यांनी दाखवली होती. पण, ऐनवेळी त्यांनी पवित्रा बदलला आणि शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे, अशी भूमिका घेतल्याचा आरोप आता अजित पवारांनीच केला आहे. तसेच, २०१७ मध्ये या राजकीय घडामोडींच्या वेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र तयार केले गेले होते आणि त्याची प्रत आपल्याकडे आजही आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभर गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीसाठी आपल्याला शरद पवारांनीच पाठवले होते आणि तसे पाठवण्याआधी फडणवीसांसोबत बैठका होऊन मंत्रिमंडळातील सदस्यांची नावेही ठरली होती, या अजित पवारांच्या आरोपालाही शरद पवार उत्तर देऊ शकले नाहीत. पवार विरुद्ध पवार या संघर्षात मोठी ठिणगी पडली, ती सुप्रिया सुळेंना शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्ष केल्यावर. अजित पवारांचे कर्तृत्व सुप्रिया यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे, हे राष्ट्रवादीशी संबंध नसलेलेही सांगू शकतील. पण, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच पवारांसाठीही अपत्यप्रेम कर्तृत्वापेक्षा महत्त्वाचे ठरले. पवारांच्या आजच्या स्थितीला हेही महत्त्वाचे कारण आहे. बाकी, सध्याच्या राजकारणात साधनशुचिता, वैचारिकता यापेक्षा ‘व्यवहार’ महत्त्वाचा झाला आहे आणि अजित पवारांना तो जास्त नीटपणे कळतो, असे म्हणावे लागेल. अर्थात, शरद पवार सत्तेसाठी काहीही करू शकतात, हे शिवसेनेला सत्तेवर बसवताना, प्रसंगी सोनिया गांधींचे मन वळवताना त्यांनी दाखवून दिले होते. पण, तो देवेंद्र फडणवीसांशी असलेल्या अहंकाराच्या लढाईचा भाग होता, हे आता सिद्ध होत आहे. समृद्धी महामार्गावर प्राण गमावणाऱ्यांबद्दल ‘देवेंद्रवासी’ असा शब्दप्रयोग करणे, हे पवारांच्या प्रतिमेला तडा जाणारे होते आणि त्यातूनही व्यक्तिद्वेषच अधिक प्रतीत होत होता. त्यामुळे अलीकडे पवारांचे असे काय आणि का होते आहे, हे त्यांच्या जवळच्यांनाही समजेनासे झाले होते. राजकीय विचारसरणी, पक्षीय राजकारण आणि व्यक्तिगत संबंधांमध्ये असे अनाकलनीय हेलकावे खाणाऱ्या त्यांच्या भूमिकेमुळेही राष्ट्रवादीच्या फुटीला बळ मिळाले असण्याची शक्यता आहे.

अजित पवार भारी आहेत, पण ते ऐनवेळी कच खातात, असे गेली तीन वर्षे म्हणणाऱ्यांना खरे तर शरद पवारांनीच वेळोवेळी कच खाल्ली होती, हे अजित पवारांनी साधार सांगितले आहे. एकाच वेळी भाजपबरोबर सत्तेत जायचे आणि तरीही आपले तथाकथित पुरोगामीपण सांभाळायचे, या दुटप्पीपणात शरद पवारांनी अंतिम निर्णयाच्या वेळी कायम कच खाल्ली. राजकारणात वेळ साधणे महत्त्वाचे असते. सध्या तरी ती अजित पवारांनी साधली आहे. इथं कुणावर कधी काय वेळ येईल, हे सांगता येत नाही आणि तशीच अनाकलनीय वेळ शरद पवारांवर आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत पवार अधिक प्रखरपणे लढतात, हा इतिहास आहे. पण, वय आणि निसर्ग यांना पर्याय नसतो, हे त्यांच्यासारख्या ‘जाणत्या’ म्हणवल्या जाणाऱ्या नेत्याला का मान्य होत नाही, हा प्रश्न आजही कायम आहे. कदाचित त्यामुळेच पवारांचा कथित ‘खंजीर’ ४५ वर्षांनी बूमरँगसारखा उलटला आहे. राजकारणात काळ कधीतरी सूड उगवतो, असे म्हणतात ते अशा गोष्टींमुळेच…

संपर्क : ९९७५७९२४६४

shailendra.paranjpe@gmail.com



Source link