कबीररंग: झिरमिर बरसिया…

0
18
कबीररंग: झिरमिर बरसिया…


हेमकिरण पत्की4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

निसर्ग म्हणजे नेमकं काय? वाहणं विसरलेली एखादी नदी निसर्ग असते. माळावरलं एकुलतं एक हिरवं झाड निसर्ग असतं. अरण्यामधल्या नीरव शांततेत दबा धरून कळपातील पाडसाची शिकार करणारा वाघ निसर्ग असतो. झाडाची पालवी निसर्ग असते अन् पाचोळाही निसर्ग असतो. आकाशातील पावसाळी मेघ आणि नाचत – नाचत केका रानभरी करणारा मोर निसर्ग असतो. मुंग्यांचं वारूळ निसर्ग असतं. हृदय – संवेदनेनं ओथंबून आपण या निसर्गाचं अवलोकन करायला हवं. स्वतःच्या सुखासाठी झाडं, पाखरं, प्राणी यांची हत्या होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

निसर्ग हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. उद्याच्या सुगीसाठी आज आपण जशी बीजांची काळजी घेतो, पीक – पाण्याविषयी आस्था बाळगतो, तसंच या संपूर्ण पृथ्वीवरच्या सजीवांप्रति आपली संवेदना हवी. माणसांच्या हातांनी जेव्हा एखादं झाड आपल्या डोळ्यांसमोर तोडलं जातं, तेव्हा आपला अवयवच कुणी तोडतोय, असा आपला भाव असतो का? पानांच्या सळसळीतून आपल्याला झाडाची चेतना जाणवते का? प्रखर उन्हातून चालता – चालता एखाद्या झाडाच्या सावलीत उभं राहिल्यावर तिची शीतलता अगदी थेट आपल्या हृदयात कधी उतरते का? निसर्गातील या साऱ्या घटकांविषयी आपण सजग असणं महत्त्वाचं आहे. कबीर अपार सजगतेनं, अपरंपार जिव्हाळ्यानं या सृष्टीचं, ऋतुचक्राचं अवलोकन करतात. त्यांच्या दृष्टीत निसर्गाची विशिष्टता नाही. निसर्गातील घटकांविषयी आपपरभाव नाही. अखंड प्रेमानं भरलेलं त्यांचं हृदय सृष्टीला – ऋतुचक्राला अंतरंगात घेतं. या निसर्गाला प्राकृतिक परमेश्वरानं बनवलं आहे, त्याच्यात माणसांच्या हाताचे कोणतेही ठसे नाहीत, असा त्यांच्या हृदयीचा भाव आहे. निसर्गाचं अवलोकन करताना कबीरांची दृष्टी टिपते…

झिरमिर झिरमिर बरसिया, पाहन उपर मेह माटी गलि पानी भई, पाहन वाही नेह।

पावसाच्या सरी सावकाश बरसतात. नद्या,ओढे – नाले, ओहोळ आणि तळी काठोकाठ भरतात. जमिनीवरली धूळ पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाते. मातीच्या पोटातही पाणी साचून राहतं. भूगर्भातलं हेच पाणी उफाळणाऱ्या झऱ्यातून बाहेर येतं. मेघातील पाण्याचा ओलावा असा जमिनीत दाटून राहतो. आपण आभाळ असतो, आपल्या हृदयात पावसानं निर्माण केलेली ओल असते. पाऊस जितका झाडांचा, तितकाच आपलाही असतो. जलाशयामधल्या पाण्याची वाफ व्हावी, तिचे मेघ व्हावेत आणि तेच पाऊस होऊन बरसावेत, तसे आपणही सृष्टीचा स्नेह घेऊन जन्माला येतो. पाऊस येतो – जातो. ओलावा मात्र कायम राहतो. आपल्यातील ओलावाही असाच कायम राहतो. एक सर्जनाचा तर दुसरा विसर्जनाचा ऋतू असतो. म्हणून तर सृष्टीचं हे चक्र अव्याहत चालू राहतं. कबीर ऋतूकडून घडणाऱ्या विसर्जनाचं दर्शन कसं घेतात ते पाहा…

फागुण आवत देखि के, मन झूरे बनराय,

जिन डाली हम केलि किय, सो ही ब्योरे जाय

फाल्गुन महिना येतोय, हे दिसल्यावर वनराज मनात झुरू लागतो. ज्या फांद्या फुलून – फळून आल्या, ज्यांच्या अंगा – खांद्यावर वसंतानं क्रीडा केली, त्या फांद्या वनराजाला आता ओक्याबोक्या दिसतात. कबीर या वनराजाच्या दृष्टीतून फाल्गुन मास अवलोकतात. सृष्टीतील विसर्जन त्यांच्या दृष्टीत भरून येतं. पानगळ, फूलगळ, फळगळ आणि अखेर बीजांचं वाऱ्यासह वाहणं हे ऋतुचक्रातलं विसर्जनच तर असतं! निसर्ग परिग्रह करत नाही. तो केवळ असतेपणाचं सूत्र सांभाळतो. सृष्टी आहे, ऋतुचक्र आहे आणि आपणही आहोत, हे जाणून घेण्यातील शहाणपण कबीरांनी निसर्गाचं अवलोकन प्रतिकात्मक न करता पुढील दोह्यांतून आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. ते म्हणतात…

फागुण आवत देखि करि बन रूना मनमॉंहि,

ऊँची डाली पात है, दिन – दिन पीले थाहि।

फाल्गुन मास येताना रान मनातून रडत रडत पाहतं.. झाडांच्या शेंड्यावरची पानं दिवसेंदिवस पिकून जाताहेत… रानातील झाडं पानाफुलांनी लहडणं ही सुंदरता आहेच; पण शेंड्यावरची पानं पिकून पिवळी होण्यातही सुंदरता असते. ‘मी’पण नसलेल्या दृष्टीनं अवलोकणाऱ्या कबीरांना ही सुंदरता जाणवते. सुंदरतेची पारख हा जीवनकाव्याचा डोळा असतो. या पारखणाऱ्या डोळ्यांनीच कबीरांचं निसर्गदर्शन घडतं. ज्यांना ही अवघी पृथ्वी विश्वाचं अंगण वाटतं, हे आकाश आपल्या निवाऱ्यावरचं छत वाटतं, ते लोक पशु-पक्ष्यांच्या, झाडांच्या हत्येमध्ये सहभागी होत नाहीत, तर ते झाडां – पाखरांच्या, नदी – समुद्राच्या आणि आभाळ – मातीच्या दिठीमिठीत आपलं असणं अनुभवतात.

संपर्क : ९४०३७६८८९१

hemkiranpatki@gmail.com



Source link